
जळगाव ः खानदेशात सुमारे १० लाख टन ऊसगाळप (Sugarcane Crushing) पूर्ण झाले आहे. गाळपात समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील कारखान्याने (Samsherpur Mill) आघाडी घेतली आहे. कारखाने यंदा मार्चअखेरपर्यंतच सुरू राहतील, असेही चित्र आहे.
मागील हंगामात कारखाने जूनपर्यंत सुरू होते. परंतु यंदा कारखाने अधिक कार्यरत आहेत. नंदुरबारात डोकारे (ता. नवापूर) येथील आदिवासी कारखाना, पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथील सातपुडा कारखाना, समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील आयान कारखाना, तळोद्यात एक खांडसरी सुरू आहे. जळगावात चहार्डी (ता. चोपडा) येथे चोपडा कारखाना, न्हावी (ता. यावल) येथे मधुकर कारखाना, घोडसगाव (ता. मुक्ताईनगर) येथे मुक्ताई कारखाना आणि बेलगंगा (ता. चाळीसगाव) येथे बेलगंगा कारखाना सुरू आहे.
जळगाव जिल्ह्यात सर्वच कारखाने खासगी व्यवस्थापनाचे आहेत. तर नंदुरबारात तीन कारखाने खासगी व्यवस्थापनाचे आहेत. धुळ्यात पांझरा-कान व शिरपुरातील शिरपूर कारखाना बंद आहेत. हे कारखाने सुरू करण्याची देखील मागणी सुरू आहे. खानदेशात आठ कारखाने सुरू असल्याने ऊसगाळप वेगात सुरू आहे.
अनेक कारखाने यंत्रणेच्या मदतीने ऊस तोडणी करून घेत आहेत. आयान कारखान्याचे गाळप सव्वापाच लाख टनांवर पोहोचले आहे. तसेच सातपुडा कारखान्याचे गाळपही सुमारे ४६ हजार टनांवर झाले आहे. जळगावात मुक्ताई कारखान्याचे गाळपही सुमारे दोन लाख टन झाले आहे. तसेच चोपडा कारखान्याचे गाळपही सुमारे दीड लाख टनांवर आहे. बेलगंगा कारखानाही वेगात सुरू आहे.
यंदा परजिल्ह्यातील कारखाने खानदेशात ऊस खरेदीसाठी येत नसल्याची स्थिती आहे. फक्त साक्री (जि.धुळे) तालुक्यातून नाशिक जिल्ह्यातील कारखाने ऊसतोडणी करीत आहेत. वातावरणही ऊस तोडणीसाठी पूरक असल्याने तोडणीत व्यत्यय आलेला नाही. ऊस गाळप वेगात सुरू असल्याने मार्चअखेरीस गाळप पूर्ण होईल. शेतात ऊस शिल्लक राहणार नाही, अशी स्थिती आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.