
औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदा १७ जानेवारी अखेरपर्यंत १ कोटी २८ लाख ७३ हजार ७३१ टन उसाचे गाळप (Sugarcane Crushing) करण्यात आले. या उसाच्या (Sugarcane) गाळपातून १ कोटी १८ लाख २० हजार १४० क्विंटल साखरेचे उत्पादन गाळप हंगामात सहभागी ६० कारखान्यांनी केले.
मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक १२ तर त्या पाठोपाठ लातूरमधील ११, बीडमधील ८, औरंगाबाद व परभणीतील प्रत्येकी ७, नांदेडमधील ६, हिंगोलीतील ५ व जालन्यातील ४ कारखाने यंदाच्या ऊस गाळपात सहभागी झाले.
उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक, तर हिंगोली जिल्ह्यात सर्वांत कमी ऊस गाळप करण्यात आले. दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातील सरासरी साखर उतारा सर्वाधिक तर बीड जिल्ह्यातील साखर उतारा सर्वांत कमी राहिला आहे.
जिल्हानिहाय गाळप व साखर उत्पादन स्थिती
औरंगाबाद : जिल्ह्यातील सात कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी ११ लाख ७८३५ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.०३ टक्के साखर उताऱ्याने ११ लाख ११ हजार २६० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
उस्मानाबाद : जिल्ह्यातील १२ कारखान्यांनी ३० लाख ९७ हजार ५४० टन उसाचे गाळप करत सरासरी ८.८० टक्के साखर उताऱ्याने २७ लाख २४ हजार ७८० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
जालना : जिल्ह्यातील ४ कारखान्यांनी ११ लाख ३३ हजार ३६५ उसाचे गाळप करत, १० लाख ९६ हजार ८७५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.६८ टक्के राहिला.
बीड : जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी १९ लाख ६९ हजार ८२८ टन उसाच गाळप करत सरासरी सर्वांत कमी ७.४३ टक्के साखर उताऱ्याने १४ लाख ६९ हजार ८६५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
परभणी : जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांनी १४ लाख ८० हजार ७२० टन उसाचे गाळप करत सरासरी ९.४६ टक्के साखर उताऱ्याने १४ लाख ४५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
हिंगोली : जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी ९ लाख २२ हजार ५५ टन उसाचे गाळप केला. सरासरी सर्वाधिक १०.३६ साखर उताऱ्याने नऊ लाख ५५ हजार १३० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
नांदेड ः जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांनी दहा लाख ७८ हजार ३४४ टन सात उसाचे गाळप केले. या गाळपातून सरासरी ९.६५ टक्के साखर उताऱ्याने दहा लाख ४० हजार १९५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
लातूर जिल्ह्यातील ११ कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळपात सहभाग नोंदविलेल्या कारखान्यांनी २० लाख ८४ हजार ४४ टन उसाचे गाळप केले. या गाळपातून सरासरी ९.७० टक्के साखर उताऱ्याने २० लाख २२ हजार २० क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.