रिसोड, जि. वाशीम : पीकविमा कंपनी (Crop Insurance Company) व शासनाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (Swabhimani Shetkari Sanghtana) गुरुवारी (ता. १९) रिसोड येथे पीकविमा हक्क मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत तालुक्यातील गाव-खेड्यांत जाऊन शेतकऱ्यांशी संपर्क केला जात आहे. शेतकऱ्यांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील-मोरे यांनी केले.
यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीने सोयाबीनचे मोठे नुकसान होऊनही पीकविमा कंपनीकडून बहुतांश शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला देण्यात आला नाही. तसेच शासनाने अतिवृष्टीची मदत जाहीर करूनही अनेक शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही.
याविरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचायत समिती समोरील मैदानावरून सकाळी ११ वाजता हा मोर्चा निघेल. तहसील कार्यालय येथे जाहीर सभा होईल. या मोर्चाला स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर, विदर्भप्रमुख दामोदर इंगोले यांची प्रमुख उपस्थिती राहील.
जिल्ह्यात जवळपास दीड लाख शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा काढला होता. तेव्हा शासनाने स्वतः मोठ्या प्रमाणात जाहिरात करून शेतकऱ्यांना विमा भरण्यास प्रवृत्त केले होते.
मोबदल्याच्या वेळी मात्र शासन कंपनीला पाठीशी घालण्याचे काम करीत आहे. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा सरकारने केली होती.
मात्र, शासकीय कर्मचाऱ्यांच्या अडेल धोरणामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत. पीकविमा भरपाई व अतिवृष्टीची मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन ‘स्वाभिमानी’ कडून करण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.