
वांगी, जि. सांगली ः कडेगाव, खानापूर, पलूस व तासगाव तालुक्यांतील शेतीसाठी जीवनवाहिनी ठरलेल्या ताकारी उपसा योजनेच्या (Takari Upsa Scheme) यंदाच्या पहिल्या आवर्तनाचे पाणी पाच दिवसांत कालव्याच्या ४४ किलोमीटरवर नेवरी-आंबेगा दरम्यान असलेल्या वितरिका क्र. ३८ पर्यंत पोहोचल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.
ताकारी लाभक्षेत्राती शेतकऱ्यांच्या मागणीनुसार योजनेचे पहिले आवर्तन सहा डिसेंबरला सुरू झाले. परंतु टप्पा १ वरून टप्पा दोनवर पाणी वाहणाऱ्या वाहिनीचा व्हॉल्व्ह फुटल्याने गळती सुरू झाली होती. त्यामुळे तत्काळ पंप वाढविणे अशक्य होते. युद्धपातळीवर व्हॉल्व्ह दुरुस्ती करून रविवारपासून (ता. ११) ‘ताकारी’चे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यावरील आठ पंप सुरू केलेत. पाणी आवश्यक दाबाने व गतीने पुढे सरकत आहे. मुख्य कालव्यातील या पाण्याने सोमवारी (ता. १२) नेवरी-आंबेगावदरम्यान ४४ किलोमीटरपर्यंत मार्गक्रमण केले आहे. त्याचवेळी टप्पा तीनवरील तीन पंप सुरू करून सोनहिरा खोऱ्यातील गावांना पाणी दिले आहे. टप्पा चारवरील एक पंप सुरू करून सोनसळ, शिरसगाव या गावांना बंदिस्त वाहिनीमधून पाणी दिले आहे.
ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात जमिनीतील नैसर्गिक पाणी अल्पकाळ टिकत असल्याने अवकाळी पावसानंतर महिनाभरात ताकारी योजना सुरू करावी लागली. ‘पाटबंधारे’च्या अधिकाऱ्यांनी प्रतिसाद देऊन येथील सिंचनक्षेत्र वाचविल्याची भावना शेतकऱ्यांत आहे. सोडलेल्या पाण्याचा उपयोग कडेगाव, खानापूर, पलूस व तासगाव तालुक्यांतील बारमाही क्षेत्रासह वाढलेल्या रब्बी हंगामातील शेतीला होणार आहे.
ताकारी योजनेचे पाणी सुरुवातीपासून सर्व पोटकालव्यांवरील शेवटच्या शेतकऱ्याला भरपूर मिळेपर्यंत संबंधित वितरिका बंद होणार नाही. शेतकऱ्यांनी या पाण्याचा जपून वापर करावा व सिंचनक्षेत्र वाढवावे.
- राजन डवरी, कार्यकारी अभियंता, ताकारी योजना
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.