
Mumbai News : ‘वीरता, भक्ती व सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, समाज बांधवांसाठी काम करण्याची शिकवण दिली.
या देशाला ‘सर्वे भन्वतुः सुखिनः’ या मंत्राची आवश्यकता असताना लाखो लोकांची फळी उभी करण्याचे काम अप्पासाहेबांनी केले,’’ अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गौरवोद्गार काढले.
शासनाच्या वतीने डॉ. अप्पासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांना २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार श्री. शहा यांच्या हस्ते देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराजे देसाई, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, खासदार श्रीरंग बारणे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, धर्माधिकारी प्रतिष्ठानचे डॉ. सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी आदी उपस्थित होते.
श्री. शहा म्हणाले, ‘कोणत्याही प्रसिद्धीची आस न ठेवता समाज सेवा करणारा हा एवढा मोठा जनसमुदाय मी आयुष्यात पहिल्यांदा पाहत आहे. या प्रकारचा मान, सन्मान, भक्तिभाव हा केवळ त्याग, समर्पण व सेवेद्वारेच मिळतो.
अप्पासाहेबांप्रती आपले प्रेम, विश्वास व सन्मान हा त्यांच्या संस्काराचा, कर्तृत्वाचा व नानासाहेबांच्या शिकवणीचा सन्मान आहे. एकाच परिवारात अनेक वीर जन्मलेले मी पाहिले आहेत.
मात्र, समाजसेवेचे संस्कार तीन तीन पिढ्यांपर्यंत असलेले मी आयुष्यात प्रथमच पाहत आहे. मुलांसाठी शिक्षण, वृक्षारोपण, स्वच्छता, रक्तदान, जलसिंचन, विहिरींची सफाई, महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्त समाज अशा विविध क्षेत्रात अप्पासाहेबांनी मोलाचे कार्य केले आहे.’’
श्री. शिंदे म्हणाले, ‘‘धर्माधिकारी कुटुंबीय राज्यात गेल्या तीनशे चारशे वर्षांपासून लोकांना दिशा देण्याचे काम करत आहे. अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, हुंडा यासारख्या अनिष्ट प्रथा दूर करण्याचे काम नानासाहेबांनी, अप्पासाहेबांनी केले.’’
श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘जगात सात आश्चर्ये आहेत. मात्र श्री सदस्यांची ही अलोट गर्दी हे जगातील आठवे आश्चर्य आहे. पैशापेक्षाही खरी श्रीमंती काय हे या श्री परिवाराकडे आणि उपस्थित श्रीसदस्यांकडे बघून समजते.’’
पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला
डॉ. अप्पासाहेब यांनी पुरस्काराची २५ लाखांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत असल्याचे या वेळी जाहीर केले. मानपत्र, सन्मानचिन्ह व पंचवीस लाखांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी लाखोंच्या संख्येने उपस्थित सदस्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.