
अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC Akola) तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, विक्रीसाठी आलेल्या सर्व मालाचे त्या त्या दिवशी लिलाव होणे कठीण झाले आहे.
यामुळे बाजार समिती प्रशासनाने गुरुवारी (ता. २)पर्यंत नवीन तूर स्वीकारली जाणार नसल्याचे जाहीर केले आहे.
त्यानंतरही शेतकऱ्यांनी तूर विक्रीला आणण्यापूर्वी संबंधित अडत्याकडून आवकेचा अंदाज घेऊनच माल आणावा, असे आवाहन केले आहे.
या हंगामातील तुरीची काढणी जोमाने सुरू आहे. तसेच नवीन तूर बाजारात विक्री आणण्यासाठी शेतकऱ्यांची एकच गर्दी होत आहे. येथील बाजारात सरासरी सात हजारांनी तूर विकत आहे.
सोमवारी (ता. ३०) बाजारात तूर ४८०० रुपयांपासून विक्री झाली. कमाल दर ७५९५ रुपये होता. दररोज दोन हजार पोत्यांपेक्षा अधिक आवक होत आहे. या आवकेमुळे बाजाराचे यार्ड तुरीच्या मालामुळे भरून गेले आहे.
बाजारात आलेल्या मालाचा दररोज लिलाव करणे कठीण झालेले आहे. त्यामुळे आलेल्या मालाची आधी विल्हेवाट लावण्यासाठी बाजार समितीने मंगळवार (ता. ३१) पासून गुरुवार (ता. २) पर्यंत नवीन आवक बंद ठेवली आहे.
यापूर्वी गेल्या आठवड्यात बाजार समितीला तुरीची आवक रोखून ठेवावी लागली होती. आठवड्यात १० हजार पोत्यांपेक्षा अधिक आवक होत आहे. दररोज येणाऱ्या मालाचा त्याच दिवसात लिलाव, मोजमाप करणे शक्य राहिलेले नाही.
त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने तुरीची आवक जास्त झाल्यामुळे व बाजार समितीमध्ये आलेल्या सर्व शेतीमालाचा लिलाव होऊ शकत नसून शेतीमाल स्वीकारणे थांबवले आहे.
सध्या दर कमी असल्याने शेतकऱ्यांनी कापूस रोखून ठेवला आहे. तर तूर विकून अनेक जण आपल्या गरजा भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
यामुळे एकाचवेळी आवक वाढत आहे. या महिन्यातही आवकेचा रोख टिकून राहण्याची शक्यता बाजार समितीतील खरेदीदारांकडून वर्तवली जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.