
अमरावती : वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे तापमानात अचानक घट झाली आहे. जानेवारीच्या सुरुवातीलाच आलेल्या थंडीच्या लाटेमुळे (Cold Wave) त्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत.
आणखी दोन दिवस ढगाळ आणि पावसाळी वातावरण राहणार असून थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. त्यातही बुधवारी (ता. चार) धुक्याची चादर पसरली होती. तुरळक पावसाचीसुद्धा काही ठिकाणी नोंद झाली.
मध्यरात्रीपासून थंडीचा कडाका वाढला आहे.
बुधवारीसुद्धा (ता. ४) याचा परिणाम जिल्ह्यात दिसून आला. सर्वत्र धुके आच्छादलेले असल्याने महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना त्रास सहन करावा लागला.
विशेष म्हणजे कडाक्याच्या थंडीचा परिणाम शाळा, महाविद्यालयांवरही दिसून आला.
विद्यार्थ्यांची उपस्थिती जवळपास अर्ध्यावर आली होती. थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम कपड्यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात चांगलीच गर्दी केली होती.
चिखलदऱ्यात भर दुपारी शेकोट्या
चिखलदरा : नवीन वर्षाच्या आगमनाबरोबरच थंडीचा तडाखा कालपासून सुरू झाला असून चिखलदऱ्यात शुक्रवारी (ता. ६) दिवसभर शेकोट्या पेटल्या.
चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन असून या ठिकाणी थंडी मोठ्या प्रमाणात असते. मात्र यावर्षी हिवाळ्यात थंडीचे प्रमाण फारच कमी होते.
परंतु कालपासून प्रथमच वातावरणात बदल होऊन एकदम गारठा वाढला असून चौकाचौकात शेकोट्या पेटल्या दिसून आल्या.
तर दुपारी चार वाजता पासूनच शेकोट्या पेटविल्या आहेत. सध्या चिखलदरा शहरासह सेमाडोह व हरिसाल या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात थंडी पडली आहे.
पुढील दोन दिवस अशाच प्रकारचे वातावरण राहणार असून काही भागात तुरळक पावसाचीसुद्धा शक्यता आहे. बुधवारी २८ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.
-डॉ. अनिल बंड, हवामान शास्त्रज्ञ.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.