
अकोला ः शेतकऱ्यांना आधीच पीकविम्याची भरपाई (Crop Insurance Compensation) तोकडी मिळत असल्याने रोष वाढलेला आहे. अशात पोस्ट हार्वेस्टिंग नुकसानीबाबत (Post Harvesting Crop Damage) सूचना देऊनही विमा कंपनीकडून सर्वेक्षणासाठी टाळाटाळ केली जात असल्याची लेखी तक्रार पातूर नंदापूर येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनीही विमा कंपनीच्या प्रतिनिधींना जाब विचारला.
याबाबत शेतकरी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले, की विमा कंपनीकडून पीकविम्याची तुटपुंजी मदत देण्यात आली आहे. याबाबत आधीच तक्रार करून निदर्शनास आणून दिले होते. समस्त शेतकऱ्यांनी आयसीआयसीआय लोम्बार्ड पीकविमा कंपनीला त्यांच्या नियमानुसार टोल फ्री क्रमांकावर ७२ तासांच्या आत फोन करून क्लेम नोंदविले होते.
क्लेम नोंदविताना प्रतिनिधींनी १० ते १२ दिवसांच्या आत विमा प्रतिनिधी पिकाच्या सर्वे करण्यासाठी येतील, असे सांगितले. शेतकऱ्यांनी त्यांना १० ते १२ दिवस जास्त होतील असे सुचविले असता विमा प्रतिनिधी व्यस्त असल्याचे कारण सांगितले.
तसेच, बऱ्याच शेतकऱ्याचे क्लेम नंतर नाकारण्याचे संदेश पाठविले. क्लेम नोंदविल्यापासून सोमवार (ता. पाच) पर्यंत एकाही शेतकऱ्याच्या शेतात पीक काढणीपश्चात पंचनामा झालेला नाही. कंपनी शेतकऱ्यांना कुठल्या निकषावर हक्काची विमाद्वारे मदत नाकारत आहे, हे कळालेले नाही.
जिल्हाधिकाऱ्यांनी धारेवर धरले
शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवर जिल्हाधिकारी अरोरा यांनी थेट विमा कंपनीच्या प्रतिनिधीला पाचारण करून सर्व्हेक्षणाबाबत प्रश्नांची सरबत्ती केली. शेतकऱ्यांसमक्ष विमा कंपनीच्या प्रतिनिधीला सर्वे का केले नाहीत, असा जाब विचारीत या शेतकऱ्यांना दोन आठवड्यात मदतीचे निर्देशही दिले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.