Ginger Market : आले दरात घसरणच अधिक...

‘कोरोना’नंतर सात ते आठ पटीने दरात घट
Ginger Cultivation
Ginger Cultivation Agrowon

विकास जाधव : ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : आले पिकांत (Ginger Market) दरातील घसरणीचे असलेले अधिक प्रमाण हे उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याचे दुसरे मुख्य कारण आहे. गेल्या पाच वर्षांपासून आले दरात घसरण कायम राहिल्याने भांडवली खर्चही निघालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. पाच वर्षांत तब्बल २५ हजार रुपयांपर्यंत दरात घसरण झाली असल्याचे दरातील आकडेवारी दिसून येत आहे.

Ginger Cultivation
Ginger Production : आले पीक झाले ‘आतबट्ट्या’चे !

आले हे नगदी पीक असून, पीक कालावधीही जास्त असल्याने भांडवली खर्चही जास्त आहे. कोरोना येण्याअगोदर म्हणजेच २०१६-१७ च्या दरम्यान प्रति गाडी (५०० किलो) ३० ते ३५ हजार रुपये दर मिळत असे. कोरोना काळात बाजार व्यवस्थेवर परिणामी होऊन मागणीही कमी झाली. यानंतर दराच्या घसरणीस सुरुवात झाली. गतवर्षी तर प्रतिगाडीस ३५०० ते ४००० रुपयांपर्यंत ‘रेकॉर्ड ब्रेक’ घसरण झाली होती.

यंदा काही प्रमाणात सुधारणा आहे, दहा ते १२ हजार रुपये प्रतिगाडीस दर मिळाला आहे. मात्र हा दर आणि उत्पादन यांचा विचार करता भांडवलही निघू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. एका बाजूला खते व कीटकनाशकांच्या किमती दुपटीने वाढत गेल्या आणि दुसऱ्या बाजूला आले पिकांच्या किमती सात ते आठ पटीने कमी झाल्या आहेत. यामुळे आले पिकास खर्च करताना शेतकऱ्यांना मर्यादा येत आहे. यातून उत्पादनात घटी बरोबर पीक अनेक वेळा पीक सोडून रोटर मारण्याची वेळ येत आहे.

Ginger Cultivation
Pune APMC : आले खरेदी व्यवहार बंद पाडले

ऊस, कांदा या पिकांच्या दराबाबत चर्चा होतात, मात्र हे पीक बहुपयोगी असतानाही हे शेतकरी अडचणीत असतानाही ऊस, कांद्याच्या तुलनेत या पिकांकडे लक्ष दिले जात नाही. यामुळे शेतकऱ्यांना व्यापारी म्हणेल, त्या दरात विकण्याशिवाय पर्याय नाही. आले पीक नाजूक असल्याने तणनाशकांचा वापर कमी करावा लागतो. मजुरांकडून जास्त कामे करावी लागत असल्याने भांडवली खर्च वाढत जात आहे.


किमान हमीभावाची गरज
आले हे नगदी पीक असून यासही इतर पिकांप्रमाणे हमीभाव मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. भांडवली खर्च, पिकांचा कालावधी तसेच सध्याची महागाई यांच्या मेळ घालून हमीभाव ठरवावा. हमीभाव जाहीर केल्यास पिकांतील आर्थिक धोके कमी होण्यास मदत होणार आहे. निर्यातीसही प्रोत्साहन मिळू शकते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

-


एजंट जादा, व्यापारी कमी
राज्यात आले पिकांचे क्षेत्र मोठे असतानाही नोंदणीकृत व्यापाऱ्यांची संख्या कमी आहे. याचा फायदा स्वयंघोषित व्यापारी (एजंट) घेऊन शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होत असते. या एजंटांचा सर्वत्र सुळसुळाट असून, हे दराची गणिते बिघडवतात. यासारख्या एजंटांवर बाजार समितीकडून ठोस पावले कारवाई करणे आवश्यक आहे.

-


आले पिकाचा सरासरी उत्पादनाचा विचार करून अर्थशास्त्र जुळविले पाहिजे. काहीच शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळते आणि लोकांना वाटते खूप पैसे मिळतात. मात्र तशी परिस्थिती नसून बहुतांशी आले उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. महागाईमुळे पिके घेणे परवडत नसल्यामुळे क्षेत्र कमी करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
- अनिल गायकवाड, प्रगतिशील शेतकरी, इंदोली, जि. सातारा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com