
सोलापूर ः दर्शवेळा अमावास्येनिमित्त (Vel Amavasya) सोलापूर जिल्ह्यातील शेतशिवारात पांडव पूजा आणि नातेवाईक, मित्र, आप्तेष्ठांसह रंगलेल्या भोजनावळीने शुक्रवारी (ता. २३) मोठा उत्साह पाहायला मिळाला.
यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांकडे आता अलीकडे पेरण्या झाल्या. त्यामुळे वेळा अमावास्येवर त्याचे सावट होते. पण त्याची जाणीव कुठेही झाली नाही. दर्शवेळा अमावास्येचा हा दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. या कालावधित रब्बी हंगामातील पिके ऐनभरात असतात. मुख्यतः ज्वारी, गहू यासह बहुतांश पिके चांगली वाढलेली असतात, या दिवशी या पिकांच्या संरक्षणाची जबाबदारी पाच पांडवांवर सोपवली जाते, अशी आख्यायिका सांगितली जाते.
त्यानुसार ज्वारी वा गव्हाच्या शिवारात त्यांच्याच धाटांची कोप करून त्यात दगडाच्या पाच पांडवांची प्रतिकात्मक पूजा केली जाते. या दिवशी पहाटेपासूनच शेतकऱ्यांच्या घरात लगबग वाढलेली असते. दुपारी बाराच्या सुमारास शेतकरी आपल्या कुटुंबीयांसह शेतात ही पूजा करण्यासाठी सहकुटुंब जातात. त्यानंतर सहकुटुंब भोजनही करतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही तोच उत्साह जिल्ह्यात कायम होता.
नैवेद्याचा खास मेनू
या पूजेसाठी खास नैवेद्याचा मेनू असतो. त्यात पुरणपोळी, शेंगादाणा पोळी, विविध प्रकारच्या पालक, चुका, मेथी, शेपू, चाकवत, बोर आदींच्या मिश्रणाची भाजी, बाजरीचे उंडे, गरमागरम भजी, पापड आणि वर थंडगार आंबिलची लज्जत काही औरच असते. त्यामुळे या नैवेद्याला विशेष महत्त्व असते. सहकुटुंबासह या दिवशी मित्र, आप्तेष्ट आणि नातेवाईक यांना खास आमंत्रित केलेले असते. त्यामुळे एक वेगळाच उत्साह शिवारांमध्ये दाठलेला दिसला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.