
चास, ता. खेड ः तालुक्यासह शिरूर तालुक्याचे नंदनवन करणाऱ्या चास-कमान ( ता. खेड ) धरणातून (Chas Kaman Dam) रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन (Rabi Irrigation) गुरुवारी (ता.२२) पासून सोडण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार चालणाऱ्या या आवर्तनात ‘टेल टू हेड’ पद्धतीने पाण्याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती चास-कमान पाटबंधारे विभागाच्या (Irrigation Department) वतीने देण्यात दिली आहे.
धरणात सद्यःस्थितीत ९४.४६ टक्के म्हणजेच ८.१२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. ८.५३ टीएमसी पाणीक्षमता असलेल्या चास-कमान धरण परिसरात चालू वर्षी पावसाळा लांबल्याने डिसेंबर महिना संपत आला तरी धरणातून आवर्तनाची मागणी शेतकऱ्यांकडून झालेली नव्हती.
मात्र काही दिवसांपूर्वी खेड तालुक्यासह शिरूर तालुक्याच्या काही भागात सुरू झालेल्या कांदा लागवडीबरोबरच अन्य पिकांच्या लागवडीसाठी पाण्याची मागणी करण्यात आल्याने चास-कमान पाटबंधारे विभागाच्या वतीने गुरुवार (ता.२२) धरणातून आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली.
सुमारे ३०० क्युसेक वेगाने धरणातून कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे. सद्यःस्थितीत चास-कमान धरणात ९६.४६ टक्के म्हणजेच ८.१२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, मागील वर्षी हाच साठा १०० टक्के इतका शिल्लक होता.
म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत तो ६.४४ टक्के इतका कमी आहे. सोडण्यात आलेले हे आवर्तन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सुरू असून शेतकऱ्यांच्या मागणीवरूनच आवर्तनाचा कालावधी ठरणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.