
रत्नागिरी : कोकणातील सर्वच नद्यांचे नव्याने सर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे. वशिष्ठी, जगबुडी, सावित्री (Savitri River) नदीलगत रस्त्यांची कामे, मातीचे भराव अशा अनेक कारणांमुळे अनेक ठिकाणी नद्यांची नैसर्गिक रचनाच बदलून गेली आहे. त्यामुळे या धोक्यांकडे वेळीच गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे; अन्यथा भविष्यात मोठ्या गंभीर परिणामांना सामोर जावे लागण्याचा इशारा अभ्यासगटाचे प्रमुख दीपक मोडक (Deepak Modak) यांनी सरकारला केली आहे.
चिपळूणच्या महापुरामागील नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने हा अभ्यासगट नेमला होता. पावसाळ्यात उपग्रहाद्वारे छायाचित्र घेऊन त्या आधारे नदीपात्रात झालेली अतिक्रमणे आणि इतर कारणांमुळे कोणत्या भागात सर्वाधिक पुराचा धोका निर्माण होतो, त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे आणि त्या आधारे पूरनियंत्रणासाठी नियोजन आराखडा तयार करण्याची गरज आहे, अशी सूचना करून, पूरनियंत्रण रेषांबाबत लोकांमध्ये असंतोष आहे.
नव्याने या पूररेषा आखण्याची मागणीही सातत्याने होते आहे; पण प्रत्येक विभागातील यापूर्वीच्या पुरांचा अभ्यास करून गणितीय आधारावर या रेषा आखण्यात आलेल्या आहेत. जीवित व मालमत्तेचे होणारे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टाळण्यासाठी घेतलेल्या निर्णयांकडे वैयक्तिक स्वार्थापेक्षा व्यापक हिताच्या दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे मोडक यांनी स्पष्ट केले.
चिपळूणमध्ये महापुरानंतर सर्वच यंत्रणांनी एकत्रितपणे गाळ काढण्यापासून ते लोकांना सावधगिरीचे इशारे देण्यापर्यंतच्या केलेल्या उपाययोजनांमुळे यावर्षी चिपळूण सुरक्षित आहे;
पावसाच्या बदललेल्या पॅटर्नमुळे अनेक नवीन समस्याही समोर येत आहेत. नद्यांना पूर येण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. नद्यांची रुंदी वाढवणे शक्य नाही. त्यामुळे यापुढे भविष्यातील बांधकामे करताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. पावसाचा इशारा देणाऱ्या यंत्रणा, लोकांना सावधगिरीचा इशारा देणारी व्यवस्था या अधिक सक्षम करण्याची सूचनाही मोडक यांनी सरकारला केली आहे. मुसळधार पाऊस झाल्यानंतर एका तासात कोकणातील अनेक नद्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होते.
पावसाबरोबरच समुद्रातील भरती, ओहोटीचाही या पुराशी थेट संबंध असतो. नद्या जेथे समुद्राला मिळतात तेथे मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने पुराचा धोकाही सातत्याने वाढत आहे. अनेक ठिकाणी नद्यांची रुंदीही कमी झाली आहे. त्यामुळे कोकणातील पुराच्या धोक्याचे वास्तव लक्षात घेऊन यावर सर्वच नद्यांच्या बाबतीत नव्याने अभ्यास करून त्यानुसार उपाययोजना करण्याचा सल्लाही मोडक यांनी सरकारला दिला आहे.
पाण्याचा विसर्ग हा एकमेव पर्याय
धरणक्षेत्रात धोक्याची पातळी वाढली की, पाण्याचा विसर्ग करणे हा एकमेव पर्याय असतो. त्यामुळे नद्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होते. त्यातूनच अनेक गावे पाण्याखाली येतात. यातून होणारे नुकसानही दरवर्षी हजारो कोटींच्या घरात असते. हे चित्र बदलण्यासाठी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग आणि पुराचा धोका याचा अभ्यास करून धरणातील पूरशोषण क्षमता वाढवणे शक्य आहे का,
याचे शास्त्रीय दृष्टिकोनातून विचारमंथन करण्याची गरजही मोडक यांनी व्यक्त केली.
धरणेच नष्ट करण्याचा काहींचा विचार हा न पटणारा असून आर्थिक नुकसान आणि जीवितहानी टाळण्यासाठी धरणांची साठवण क्षमता वाढवणे,
पावसाचा बदलता पॅटर्न लक्षात घेऊन धरणातून पाणी सोडण्याच्या पद्धतीत सुधारणा करता येईल का, यावर या विषयातील तज्ज्ञ आणि सरकारी यंत्रणा यांनी एकत्रित विचार करणे गरजेचे आहे.
- दीपक मोडक, सेवानिवृत्त मुख्य अभियंता जलसंपदा विभाग.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.