
ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : ‘‘शेतकरी उत्पादक कंपन्या (Farmer Producer Companies) देशातील शेतीचे चित्र बदलू शकतात. अशा मजबूत सक्षम मूल्यसाखळ्या उभ्या राहणे, हीच काळाची गरज आहे. अशा कंपन्यांच्या माध्यमातून एकत्र येत शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा,’’ असे प्रतिपादन केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव मनोज आहुजा (Sachin Ahuja) यांनी केले.
आहुजा यांनी मंगळवारी (ता.२७) मोहाडी (ता. दिंडोरी) येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला भेट दिली. त्यावेळी त्यांनी शेतकरी व शेती क्षेत्रातील स्टार्ट अप’ सुरु केलेल्या उद्योजकांशी संवाद साधला. या वेळी केंद्रीय कृषी सचिव (अतिरिक्त) अभिलाष लिखी, फलोत्पादन आयुक्त प्रभात कुमार, राज्याचे फलोत्पादन संचालक कैलास मोते, सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे आदी उपस्थित होते.
आहुजा म्हणाले, ‘‘बियाण्यापासून ते उत्पादन तंत्रज्ञान व बाजारापर्यंत शेतकरी एकत्र येताहेत.‘सह्याद्री‘च्या माध्यमातून असे पूर्ण मूल्यसाखळीचे मॉडेल उभे राहिले आहे. शेतीतील संपूर्ण मूल्यसाखळीचे ‘सह्याद्री’मॉडेल देशभरातील शेतीत पसरले पाहिजे. शेतीतील प्रश्न खूप मोठे आहेत. मात्र ते सोडविण्यासाठी स्वतः: शेतकऱ्यांनीच पुढाकार घेतला तर खूप मोठी प्रगतीही साधली जाऊ शकते. ‘सह्याद्री’ हे आदर्श उदाहरण आहे. ‘सह्याद्री’च्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.’’
‘‘केवळ शेतकरीच नव्हे तर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान तयार करणारे तंत्रज्ञ, तरुण उद्योजक यांचेही जाळे उभे राहिले आहे, ही विशेष कौतुकास्पद बाब आहे. देशभरातील शेतीत या बाबींचा समावेश होणे आवश्यक आहे. केवळ शेतीतील ताजे उत्पादन विक्री करण्यापर्यंतच न थांबता त्याचे मूल्यवर्धन करण्यावर सह्याद्रीने व त्यांच्याशी जोडलेल्या स्टार्ट कंपन्यांनी भर दिला आहे. ही काळाची गरज आहे. या सगळ्यांशी आपल्या राष्ट्रीय संशोधन केंद्र, आयसीएआर या सारख्या शासनाच्या संस्थाही जोडलेल्या आहेत. या परस्परांत तंत्रज्ञानाचे सामंजस्य करार होताहेत. हेच शेतीचे भवितव्य आहे,’’ असे आहुजा म्हणाले.
‘‘कृषी संबंधित काही स्टार्टअपबरोबर पुढील महिन्यात चर्चा करून केंद्राच्या विविध विभागांमार्फत त्यांच्या उपयुक्ततेबाबत पायलट प्रयोग करण्यात येईल,’’ असे आश्वासन आहुजा यांनी दिले.
विलास शिंदे यांनी सादरीकरणातून कंपनीचा प्रवास उलगडला. डिजिटल इम्पॅक्टचे संदीप शिंदे, 'वेसाटोगो' स्टार्टअपचे अक्षय दीक्षित, गोदाम इनोव्हेशनच्या संचालिका कल्याणी शिंदे, पराग नार्वेकर, ‘सह्याद्री एच स्क्वेअर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद राजेभोसले आदींनी सादरीकरण केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.