
मुंबई : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही. हे जनाधार नसणारे सरकार आहे. लोकांचा पाठिंबा नाही हे वारंवार सिद्ध होत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बुधवारी (ता. ८) मुंबईत केली.
विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रातील जनमत या सरकारला पाठिंबा देत नाही.
अनेक ठिकाणी या नेत्यांच्या सभा होतात त्यावेळी खुर्च्या रिकाम्या असतात आणि नेते मात्र बोलत असतात.
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वरळीची सभा अखंड महाराष्ट्राने पाहिली. मुख्यमंत्री बोलत आहेत आणि खुर्चीवर माणसेच नाहीत, यातूच काय ते कळते.
आदित्य ठाकरे यांच्या वाहनावर दगडफेक झाल्याचे समजते. शिंदे गटाच्या आमदारांनी अशा थराला पोहोचायला नको होते.
शिंदे गटाच्या आमदारांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने त्यांनी ही कृती केली आहे. जेव्हा मुद्दे संपतात तेव्हा विरोधक गुद्द्यावर येतात.
आदित्य ठाकरे आपल्या मतदारसंघात आले, याची भीती बंडखोर आमदारांच्या मनात असल्यामुळे दहशत पसरवणे, त्यांच्यावर दगडफेक करणे असा प्रकार केला आहे. ही नाकर्तेपणाची भूमिका आहे.
महाराष्ट्रात बिहारसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचा बिहार या लोकांनी केला. महाराष्ट्रात पत्रकार सुरक्षित नाहीत.
पत्रकारांवर दबाव आणून पाहिजे त्या गोष्टी लोकांसमोर आणायच्या हा कावा सत्तारुढ पक्षाचा दिसतो त्यामुळे पत्रकाराला चिरडून मारण्यात आल्याच्या घटना घडत आहेत. त्याचा निषेध करावा तितका कमी आहे, असेही ते म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.