Agriculture Development : शेतीच्या विकासासाठी अधिक काम व्हावे

राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी; ‘पंदेकृवि’त ३६ वा दीक्षांत सोहळा
BhagatSingh Koshyari
BhagatSingh KoshyariAgrowon

अकोला ः ‘‘महाराष्ट्र हे सर्व पिकांच्या उत्पादनात अग्रेसर (Maharashtra In Agriculture) असलेले राज्य आहे. भारताची आर्थिक राजधानी याच राज्यात आहे. अशा राज्यात होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांवर (Farmer Suicide) विचार व्हायला हवा. शेती ही मुख्य असल्याने त्यादृष्टीने विकासासाठी काम व्हावे,’’ असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी येथे मांडले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३६ व्या दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या वेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मोतीलाल मदान, कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, कार्यकारी परिषदेचे सदस्य, माजी कुलगुरू आदी उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदाच्या दीक्षांत सोहळ्यातही केवळ पदक विजेते, पदव्युत्तर शिक्षण घेणारे आणि आचार्य पदवी मिळालेल्यांनाच सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती.

BhagatSingh Koshyari
ई- पीक पाहणी पथदर्शी ः राज्यपाल कोश्यारी

कोश्यारी म्हणाले, ‘‘केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता निर्यातक्षम पीक उत्पादनावर आपण काम करण्याची आवश्‍यकता आहे. जास्तीत जास्त ‘जीआय टॅगिंग’ कसे होतील, पेटंट कशा पद्धतीने मिळतील, यासाठी काम व्हावे. आज सुविधा मिळाल्याने जळगावची केळी निर्यात होते. कधी नव्हे इतके भाव या केळीला मिळत आहेत. जर शेजारच्या प्रदेशातील पीक अधिक भाव मिळवत असेल तर आपल्या विदर्भात पिकविलेल्या मालाची निर्यात करून आपण अधिक भाव कसे भेटतील, या साठी प्रयत्न करावेत. त्यासाठी कृषी विद्यापीठाने त्या दिशेने काम करावे.’’

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘किसान रेल्वे’तून शेतकऱ्यांचा माल दूरच्या ठिकाणी सहज पोचू शकतो. आता समृद्धी महामार्गाच्या निर्मितीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे उत्पादन देशाच्या कानाकोपऱ्यात जलदगतीने पोहचणे शक्य होईल,’’ असेही कोश्‍यारी म्हणाले.

‘‘विद्यार्थ्यांनी आपले ध्येय उच्च ठेवावे. चांगल्या क्षेत्रात काम करावे. गावासाठी, शेतीच्या विकासासाठी योगदान द्यायला पुढे आले पाहिजे. घेतलेल्या ज्ञानाचा वापर अधिकाधिक शेती, शेतकऱ्यांसाठी करावा,’’ असा सल्लाही त्यांनी दिला.

गडकरी म्हणाले, ‘‘अनेकांच्या बलिदानातून पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची विदर्भात स्थापना झाली. विदर्भातील शेतीच्या उत्पादन वाढीत ‘पंदेकृवि’चा वाटा आहे. आज ग्रामीण भागातून होणारे स्थलांतरण आपण रोखू शकलो पाहिजे. खेड्यात रोजगार, पायाभूत सुविधांचा अभाव आहे. या बाबींचा विचार करून आपण हे स्थलांतरण कसे रोखू, यासाठी प्रयत्न व्हावेत.’’

डॉ. मदान यांनी सामान्यांपर्यंत ‘कृषी’चे आधुनिक तंत्रज्ञान पोचविण्याची गरज मांडली. डॉ. भाले यांनी विद्यापीठाने विविध क्षेत्रात केलेल्या घोडदौडीचा आढावा सादर केला. या वेळी एमएसस्सी कीटकशास्त्र विषयात सर्वाधिक पारितोषिके मिळवणाऱ्या पूनम हनुमंतराव देशमुख हिच्यासह इतर गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते पदक, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

‘शेतकऱ्यांना हवे ते तंत्रज्ञान, वाण द्या’

‘‘विद्यापीठाने शेतकऱ्यांना हवे असलेले संशोधन, तंत्रज्ञान, वाण दिले पाहिजेत. विदर्भात संत्रा, कापूस चांगला पिकतो. येथे संत्रा लागवड मोठ्या क्षेत्रावर असल्याने दर्जेदार रोपांच्या चांगल्या नर्सरी स्थानिक पातळीवर झाल्या पाहिजेत. जगात सोयाबीनचे उत्पादन आपल्यापेक्षा खूप अधिक आहे. त्‍यांना उत्पादकता वाढवणे जमले ते आपणाला का जुळत नाही’’, असा प्रश्‍न गडकरी यांनी विचारला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com