
Nashik News : मधमाशीपालन व्यवसायात प्रचंड क्षमता आणि फायदे आहेत. मात्र मोठ्या व्यापक प्रमाणावर शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे. उत्तर भारतात सफरचंद पिकाच्या अनुषंगाने परागीभवन प्रक्रियेत मधमाशी पेट्यांची सेवा घेऊन उत्पादन व गुणवत्ता वाढीचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.
त्याचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे अन्ननिर्मितीमध्ये मधमाश्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अन्यथा, अन्नसुरक्षेचा धोका निर्माण होईल. त्यामुळे अधिवास टिकून ठेवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने कामकाज होणे काळाची गरज आहे, असे मत सोलन (हिमाचल प्रदेश) येथील डॉ. वाय. एस. परमार कृषी विद्यापीठाचे मधमाशीपालन विषयाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. हरीश शर्मा यांनी मांडले.
महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे आणि ग्रीनझोन ॲग्रोकेम (नाशिक) संचलित बसवंत मधमाशी उद्यान व प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोनदिवसीय राज्यस्तरीय परिसंवाद २० व २१ रोजी झाली.
‘मधमाशीपालनाची महाराष्ट्रातील सद्यःस्थिती आणि नावीन्यपूर्ण संकल्पनेतून उद्योजकता विकास’ या विषयावर तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवसाच्या चर्चासत्रात ‘परागीभवनासाठी मधमाशी सेवा पुरवठा’ या विषयावर डॉ. शर्मा बोलत होते.
सत्राच्या अध्यक्षस्थानी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिकचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम होते. या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. बी. बी. पवार, कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ, तनिष्क ग्रामीण सेवा संघाचे (उत्तर प्रदेश) सचिव संजीव तोमर, मधमाशी उद्योजक मदन शर्मा (चंडीगड), सुभाष कंबोज (हरियाना), ग्रीनझोन ॲग्रोकेम मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पवार, तांत्रिक संचालक व कार्यक्रम समन्वयक डॉ. भास्कर गायकवाड, तंत्र अधिकारी विश्वास बर्वे आदी उपस्थित होते.
केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणेचे निवृत्त तांत्रिक अधिकारी डॉ. धनंजय वाखले म्हणाले, मधाचा दर्जा व प्रकारानुसार त्याची काढणी, मध संकलन, साठवणूक शास्त्रीय पद्धतीने कामकाज होणे गरजेचे आहे.
मधाची फक्त चव व वास नको तर अस्सल गुणधर्म यासाठी विक्री करताना प्रमाणित लेबल महत्त्वाचे आहे. मधाची काढणी केल्यानंतर त्याची कुठलीही प्रक्रिया न करता गुणधर्म तसेच ठेवल्यास दर्जा टिकून राहतो.
त्यासाठी प्रक्रियेत शिफारस केलेल्या साहित्याचा व उपकरणाचा वापर करावा. या वेळी सुप्रकृती मधुशाळा नाशिकचे संचालक डॉ. तुकाराम निकम, कृषी विज्ञान केंद्र कोसबाड (जि. पालघर) येथील विषय विशेषज्ञ उत्तम सहाणे यांचा सन्मान करण्यात आला.
समूह आधारित कामकाजाला विशेष महत्त्व
मध उत्पादनाच्या गुणवत्तेप्रमाणे दर मिळत असतात. त्यामुळे कामकाज हे काटेकोर होणे गरजेचे आहे. त्यामुळे समूह आधारित कामकाजाला विशेष महत्त्व आले आहे. कोरोनानंतरच्या काळात मधसंबंधित उत्पादनांना मोठी मागणी वाढली आहे.
कृषिपूरक उद्योग म्हणून याकडे पाहत असताना दुय्यम पद्धतीने नको तर पूर्णवेळ झोकून काम केल्यास त्यातून मोठ्या संधी निर्माण होणे शक्य असल्याचे मत नवी दिल्ली येथील मधमाशी तज्ज्ञ डॉ. देवव्रत शर्मा यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.