
Pune News मार्च महिन्यापाठोपाठ एप्रिल महिन्यातही वादळी पाऊस आणि गारपिटीचे (Hailstorm) सत्र सुरूच आहे. शुक्रवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीने तडाखा दिला. सततच्या पावसामुळे (Unseasonal Rain) हजारो हेक्टरवरील रब्बी, उन्हाळी पिकांचे नुकसान (Rabi Crop Damage) झाले आहे. नुकसानीचा दिवसागणिक आकडा वाढतच आहे.
सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २८) पहाटे आणि पुन्हा सकाळी नऊच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने काही भागात हजेरी लावली. या पावसामुळे आंबा, केळी, डाळिंब, उन्हाळी सोयाबीन, कांदा, ज्वारी पिकाला फटका बसला.
प्रामुख्याने पंढरपूर, बार्शी, करमाळा आणि दक्षिण सोलापुरात हा पाऊस झाला. बार्शी तालुक्यात ज्वारीसह उन्हाळी सोयाबीन, कांदा, मका पिकांचे, करमाळ्यात केळीचे नुकसान झाले. तर दक्षिण सोलापुरात केळी आणि पपईला फटका बसला.
खानदेशात आठवड्यात सलग तीन दिवस गारपीट व वादळी पाऊस झाला आहे. यामुळे पीक हानी देखील वाढली आहे.
गुरुवारी (ता.२७) जळगाव जिल्ह्यात जामनेर, पाचोरा, बोदवड भागात पाऊस व गारपीट झाली. तसेच चोपडा, धुळ्यातील शिरपूर भागातही पाऊस, वादळ झाले. यात केळीचे अधिक नुकसान होत आहे. मका, बाजरीलादेखील सर्वत्र फटका बसला आहे.
गुरुवारी धुळ्यातही धुळे, शिंदखेडा व शिरपूर भागात मध्यम पाऊस, वादळ किंवा सुसाट वारा वाहत होता. शिरपुरात निसावलेल्या केळीची झाडे कोसळली आहेत. नंदुरबारातही सातपुडालगत सुसाट वारा व तुरळक पाऊस झाला.
वादळी पाऊस मराठवाड्याची पाठ सोडताना दिसत नाही. शुक्रवारी (ता. २८) पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. याचा फटका आंबा, मोसंबीसह उन्हाळी, रब्बीतील काढलेल्या पिकांना बसला आहे.
छत्रपती संभाजीनगर मधील चापानेर, टाकळी, राजेराय, पाचोड, लिंबे, जळगाव, गवळीशिवरा, महालगाव, शिऊर, गंगापूर, कायगाव यासह सोयगाव तालुक्यात पावसाची वादळासह हजेरी कायम राहिली. जालना जिल्ह्यात वादळासह जोरदार पाऊस तसेच रामनगर व विरेगाव परिसरात गारपीट झाली.
धाराशिव जिल्ह्यातील तुरोरी परिसरात गुरुवारी सायंकाळपासून अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. लातूर जिल्ह्यातील तांदुळजा मदनसुरी उजनी औराद शहाजानी शिवारात वादळी पाऊस झाला.
अकोला जिल्ह्याला वादळी पाऊस, गारपिटीचा जोरदार तडाखा बसला. गुरुवारी (ता. २७) सायंकाळी पातूर तालुक्यात २० मिनिटे मोठी गारपीट झाली.
सलग तिसऱ्या दिवशी बार्शीटाकळी व पातूर तालुक्यांना गारपिटीने झोडपले. पावसाच्या थैमानामुळे पातूर व बार्शीटाकळी तालुक्यातील पिकांचे, फळबागांचे नुकसान झाले.
आंबा, कलिंगड, खरबूज, पपई, संत्रा, मोसंबी, लिंबू, कांद्याला फटका बसला. वाशीम जिल्ह्यातही मोठे नुकसान झाले. कोंढाळा (झामरे) (ता. वाशीम) येथील युवकाचा गुरुवारी (ता. २७) अंगावर वीज पडून मृत्यू झाला.
पुणे जिल्ह्यातील हवेली, शिरूर, खेड, सासवडसह पुण्याच्या उपनगरांमध्ये शुक्रवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. चारा पिके, काढून ठेवलेली उन्हाळी पिके झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या सप्ताहापासून नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने अनेक भागात धुमाकूळ घातला. गुरुवारी (ता.२७) व शुक्रवारी (ता.२८) पावसामुळे शेतीमालाचे नुकसान झाले.
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह हलकीशी गारपीट झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी उन्हाळा कांदा भिजला. सटाणा, कळवण, मालेगाव, नाशिक, येवला, निफाड तालुक्यातही उन्हाळ कांद्याला पावसाचा फटका बसला.
परभणी, हिंगोलीला सर्वाधिक तडाखा
परभणी व हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपर्यंत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. जोरदार पाऊस, वादळी वारे, गारपिटीमुळे आंबा, केळी, पपई आदी फळे, कांदा बीजोत्पादन, भाजीपाला पिकांसह उन्हाळी बाजरी, ज्वारी, सोयबीन तसेच शेतात वाळवत घातलेल्या हळद भिजून झालेल्या नुकसानीत दिवसेंदिवस भर पडत आहे.
- सोलापुरात वादळी पावसाचा पुन्हा तडाखा
- खानदेशात पाऊस अन् गारपीट
- मराठवाड्यात पाऊस पाठ सोडेना
- परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये गारपिटीचा कहर
- अकोला, वाशीममध्ये गारपिटीचा पिकांना दणका
- पुण्यात जोरदार पाऊस
- नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याला फटका
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.