
Maharashtra Politics News : देशात आज चित्र बदलत आहे. काही शक्ती अशा आहेत, की पाच-पन्नास वर्षे समाजाला, देशाला मागे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. सामान्य लोकांत संघर्ष कसा निर्माण होईल याची ते खबरदारी घेत आहेत, जाती व धर्माच्या नावाने समाजात संघर्ष निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहे.
ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे. ते सत्तेचा उपयोग कष्टकऱ्यांसाठी, लहान लोकांसाठी होत नाही. याची समज या राज्यकर्त्यांना नाही. जाती व धर्माच्या नावाने ते अंतर वाढवत चालले आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
नगर येथे रविवारी (ता. २१) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य हमाल महामंडळाचे २१ वे त्रैवार्षिक राज्यव्यापी अधिवेशन झाले. पद्मश्री पोपटराव पवार, आमदार नीलेश लंके, संग्राम जगताप, आमदार प्राजक्त तनपुरे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.
नगर जिल्हा पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक मान्यवर होऊन गेले. याच नगर जिल्ह्यात शेवगावला चार दिवस बाजारपेठ बंद होती. जाती-जातींत अंतर वाढले. संघर्ष वाढविण्याचा काम काही शक्ती करत आहेत. त्यांच्या विरोधात संघर्ष उभा केला नाही तर कष्टकरी, हमाल-माथाडींचे जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.
माथाडी कायदा सुखासुखी झालेला नाही. अण्णासाहेब पाटील, बाळासाहेब देसाई, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील अनेकांनी क्षेत्रीय भेटी दिल्या. कष्टकरी, हमाल, माथाडी यांना एकत्रित केले.
त्यांच्या हक्कासाठी कायदा करून घेतला. त्यामुळे तुमच्या जीवनात एक प्रकारची शाश्वती आली. महाराष्ट्रात कष्टकरी जनता ही कधीच गुंडगिरी करत नाही. बाबा आढावांनी ते कधीच खपवून घेतले नाही.
या कष्टकरी जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका आपल्याला घेतली पाहिजे. एकत्र आपण आलो पाहिजे. त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. कारण काही लोकांच्या डोळ्यात हा कायदा खुपतो आहे, असेही पवार म्हणाले.
चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न
‘माथाडी चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याविरुद्ध उभे राहण्याची गरज आहे. आज कारखानदारी वाढली. ती वाढावी यासाठी प्रयत्न केले. कारखानदारी वाढते हाताला काम मिळते चांगली गोष्ट आहे. पण, ते काम देत असताना जो काम करणारा आहे त्याला कायद्याने जे संरक्षण आहे.
आज त्या कायद्याच्या संरक्षणावर हल्ला चढवण्याचे काम काही लोकांकडून केले जात आहे. माथाडी हमाल कायदा हा राज्यात सुरू झाला. त्या कायद्यानं कष्टकऱ्यांना सन्मानानं जगण्याची संधी दिली. पण काही लोक असे आहेत त्यांना हा माथाडी कायदा खुपतोय. गुंडगिरी करून माथाडी चळवळीला बदनाम करतील तर त्या लोकांविरुद्ध तुम्हाला उभं राहावं लागेल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.