
यवतमाळ : शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा देत व्यापाऱ्याने दोन कोटींनी गंडा घातला. शेतमाल विक्रीचे पैसे (Agriculture Produce Payment) न मिळाल्याने याप्रकरणी कारवाईसाठी शेतकऱ्यांनी १० ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाचा (Hunger Strike) इशारा दिला आहे.
शेतकरी मागील आठ ते नऊ वर्षांपासून शेतमाल सदर व्यापाऱ्याकडेच विक्री करतात. वेळेवर पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांचा विश्वासही संपादन केला होता. २०२०-२१ या हंगामात शेतातून निघालेला कापूस, सोयाबीन, तूर, चना हा माल नंदकिशोर ऊर्फ सुनील महल्ले या व्यापाऱ्याला विक्री केला.
शेतकऱ्यांना आपल्या रक्कमेची प्रतीक्षा असताना दहा जून २०२१ रोजी व्यापारी रात्री अचानक पसार झाला. शेतकऱ्यांना दिलेले धनादेश वटविण्यासाठी बँकेत टाकले असता, ते वठले नाहीत. ३१ जुलै २०२१ ला शेतकऱ्यांनी दारव्हा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. काही दिवसांनी आश्वासन दिलेल्या लोकांनीच सदर माल परस्पर विक्री केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ही बाब माहिती पडल्यावर ३० मार्च २०२२ ला शेतकऱ्यांनी पोलिसांत परत तक्रार दिली. त्यावरही कार्यवाही झाली नाही. फरार व्यापारी सुनील महल्ले याला पोलिसांनी अटक केली नाही.
त्याचा शोध घेतला जात नसल्याने शेतकऱ्यांनी २८ जून रोजी पोलिस अधीक्षकांपासून तर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. त्याकडेही लक्ष देण्यात आले नाही.
अखेर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
त्यावर माधव राठोड, प्रकाश दहापुते, जहूर महंमद, सुनील तुपटकर, कृपाळू लोधे, अली महंमद नूर महंमद, आरिफ जावेद न्यामुमिया, रवी राठोड, नीलेश ओले, रामराव भालेराव, किरण भालेराव, आशिष ओले, ताजुद्दीन देशमुख, दिगांबर मोहोड, संजय गावंडे, अनिल ढवळे यांच्यासह ४१ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पोलिस ते प्रशासनापर्यंत सर्वच पातळीवर निवेदन देत शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला. प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.