जि. सोलापूर : विश्रांती घेतलेल्या पावसाने पांगरी (ता. बार्शी) परिसरात सोमवारी (ता.२६) सकाळी सुमारे अडीच तास हजेरी लावली.(Heavy Rainfall) अचानकपणे झालेल्या या पावसाने नदी, नाल्यांना पूर आला. परिणामी, बार्शी-लातूर रस्त्यावरील पांगरीजवळील खाटीक ओढ्यास मोठ्याप्रमाणात पूर आल्याने जवळपास दोन तास वाहतूकही (Traffic) ठप्प झाली होती.
या आधीच पावसामुळे शेतातील सर्व कामे ठप्प झाली असून, काढणीस आलेल्या सोयाबीन पिकांस फटका बसला आहे. मात्र माळरानाच्या व हलक्या प्रतीच्या जमिनीवरील सोयाबीन, उशीर पेरणी झालेल्या सोयाबीनला हा पाऊस पोषक ठरला आहे. हा पाऊस प्रामुख्याने पांगरीसह ममदापूर, चिंचोली, जहानपूर, गोरमाळे आदी गावांच्या परिसरात झाला.
रविवारी (ता. २५) दुपारी तीन वाजेच्या सुमारास जोरदार सरी कोसळल्या होत्या. सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस कोसळला.
सोयाबीन, आता कांद्याला दणका : अनेक भागांतील सोयाबीन या आधीच्या पावसाने गेलेच, पण आताही या पिकाचे नुकसान झाले आहे. काही भागांत वाफसा आल्याने कांदा लागवडीकडे शेतकरी वळले आहेत.
काही ठिकाणी लागवडीही सुरू झाल्या आहेत. पण तोवरच पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने पुन्हा नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शासनाकडून मिळणाऱ्या मदतीबाबत मात्र शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.
‘‘बार्शी तालुक्यातील काही गावांत नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.
तालुक्यातील उर्वरित नुकसानग्रस्त मंडलांना मदतनिधी मिळण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. निधी मिळाल्यानंतर राहिलेल्या नुकसानग्रस्तांना मदत देण्यात येईल,’’ अशी माहिती तहसीलदार सुनील शेरखाने यांनी दिली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.