
Mumbai News : ‘‘मी राजीनामा दिला नसता तर सरकार पुनर्स्थापित करता आले असते, अशी टिप्पण्णी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. मात्र, मी मोठे केलेल्या लोकांनी मला धोका दिला. त्यामुळे मी नैतिकतेपोटी राजीनामा दिला.
आता सर्वोच्च न्यायालयाने कान उपटल्यानंतर थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा,’’ अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
सत्तासंघर्षावरील सुनावणीनंतर निकालपत्राचे वाचन झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांच्यासोबत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लोकशाही वाचविण्यासाठी आहे. सत्तेसाठी हापापलेल्यांचे उघडेनागडे राजकारण या निकालानंतर समोर आले आहे. राज्यपालांची भूमिका अयोग्यच होती. त्याचे वस्त्रहरण आज झाले आहे.
राज्यपाल ही यंत्रणा आदरयुक्त यंत्रणा होती. त्याचे धिंडवडे शासनकर्ते काढत आहेत. ही यंत्रणा राहावी की नको यासाठी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल. राज्यपाल ही यंत्रणा चाकरासारखी वापरली जात आहे.’’
‘‘आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांवर सोपवला असला तरी पक्षादेश हा आमचाच राहील. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावाच लागेल. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेय की, ‘मी राजीनामा दिला असता तर मी कायम राहिलो असतो’ पण माझी लढाई माझ्यासाठी नाही, तर लोकांसाठी आहे.
कायदेशीर दृष्ट्या माझा राजीनामा चुकीचा असेल पण ज्या पक्षाने, आम्ही ज्यांना मोठे केले त्यांनी माझ्यावर बोट दाखवले, गद्दार लोक माझ्यावर अविश्वास ठराव आणणार असतील तर ते माझ्या नैतिकतेत बसत नाही.
त्यामुळे मी राजीनामा दिला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांजवळ थोडी जरी नैतिकता असेल तर दोघांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी आता तरी सुधरावे,’’ असा टोला ठाकरे यांनी मारला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.