
पुणे ः राज्याच्या अप्पर भीमा खोऱ्यातील (Bhima Valley) पाण्याचे व्यवस्थापन (Water Management) आतापासूनच करावे लागेल. कारण येत्या काही वर्षांनंतर या खोऱ्यात बदलत्या हवामानामुळे (Climate Change) अतिवृष्टी व दुष्काळ (Drought) अशी संकटांची दोन्ही दृष्टीस पडतील, असा इशारा शास्त्रज्ञ व अभ्यासकांनी दिला आहे.
अमेरिका, जर्मनी आणि ऑस्ट्रियातील नामांकित विद्यापीठे आणि संशोधन संस्थांनी ‘वातावरण बदलाचा अन्न, पाणी आणि ऊर्जा यावर होणारा संभाव्य परिणाम (फ्यूज) या विषयावर संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे. त्यातून हाती आलेल्या निष्कर्षानुसार, अप्पर भीमा खोऱ्याला भविष्यात भीषण संकटाला सामोरे जावे लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या संशोधनात पुण्यातील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था हे अभिमत विद्यापीठ सहभागी झालेले आहे. या प्रकल्पातून काही उपक्रम वडगाव घेनंद गावासह इतर ठिकाणी राबविले जात आहेत. त्याचा आढावा घेणारी एक कार्यशाळा अलीकडेच झाली. तसेच, ‘फ्यूज’ संशोधन प्रकल्प प्रमुख डॉ. बर्नड क्लोवर, डॉ. क्रिस्टल क्लासर्ट आणि डॉ. यास्मिम या जर्मन अर्थातज्ज्ञांनी प्रकल्पातील जलसंधारण व पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामांची पाहणी केली.
या वेळी डॉ. बर्नाड म्हणाले, की भविष्यात अन्न, पाणी आणि ऊर्जा या तीन मुख्य समस्या असतील. त्यातही पुन्हा या समस्यांचे केंद्रस्थान पाण्याभोवती असेल. त्यामुळे गावपातळीवर जलसंवर्धन करणे व त्यासाठी सूक्ष्म पाणलोट क्षेत्रांचा विकास करणे हे दोनच पर्याय आता आपल्या हाती आहेत.
डॉ. धनंजयराव गाडगीळ शाश्वत विकास केंद्राचे समन्वयक डॉ. कैलास बवले यांनी सांगितले, की शहरी भागातील अन्न, पाणी व ऊर्जेची समस्या सोडवण्यासाठी आधी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तेथे स्थानिक छोटे जलसंधारण व ऊर्जा प्रकल्प उभारावे लागतील. गावातील पाणी गावातच साठवून भूजल पातळी वाढवावी लागेल. कचऱ्यापासून वीजनिर्मिती करावी लागेल. अपारंपरिक अर्थात हरित ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकाधिक सौर कृषिपंप पुरवावे लागतील.’’
डॉ. बवले यांच्या म्हणण्यानुसार, भविष्यातील संकटाला सामोरे जाण्यासाठी शहरी व ग्रामीण या दोन्ही भागांच्या संसाधन विकासात समन्वय साधावा लागेल. त्यासाठी आता ‘नॉलेज-कॉलेज- व्हिलेज योजना’ सुरू करण्यात आली आहे. त्यात नॉलेज पार्टनर म्हणून सहभागी असलेल्या आळंदी येथील एमआयटी महाविद्यालयाचा समावेश आहे. या उपक्रमात पाच तालुक्यांमधील महाविद्यालये सहभागी होणार आहे. त्यासाठी गोखले अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे, कुलसचिव डॉ. रथ, प्रा. डॉ. राजस परचुरे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
‘फ्यूज’अंतर्गत वनौषधींची लागवड
वडगाव हद्दीतील ७०० एकर वनक्षेत्रात संयुक्त वन व्यवस्थापन प्रकल्प राबविला जात आहे. ‘फ्यूज’च्या अंतर्गत या भागात वनौषधींची लागवड करून त्याचे लाभ गावातील २० महिला बचत गटांना होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच या भागात प्रक्रिया उद्योग विकसित करण्यासाठीदेखील पाठपुरावा केला जाणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.