
सातारा ः जिल्ह्यातील शेतकरी, उद्योजक व सर्वच घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी जिल्हा बँक आघाडीवर असते. बँकेच्या किसान क्रेडीट कार्डधारकांना (Kisan Credit Card) अडीअडचणीच्या काळात अतिवृष्टी, शेतीमालाचे चढ-उतार, खते, बी- बियाणे (Seed), औषधे खरेदी, शेतीमशागतीस व शेतीकारणाची आर्थिक गरज पूर्ण होण्यासाठी ‘किसान सन्मान मध्यम मुदत कर्ज योजना’ (Farmer Loan) या नावाने दहा हजारांपर्यंत तातडीचा नव्याने कर्जपुरवठा (Loan Supply) करण्याचे धोरण अवलंबिले आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई व संचालक मंडळाने केले आहे.
बँकेमार्फत विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून ही योजना पीककर्ज घेणाऱ्या व त्याची नियमित परतफेड करणाऱ्या सभासदांसाठी कार्यान्वित केली आहे. त्यांना बँकेच्या शाखेत बचत खाते प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे नियमित अनुदान जमा होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी बँकेच्या योजनांची माहिती दिली. बँकेमार्फत शेतकरी व नव उद्योजकांसाठी अनेकविध योजनांद्वारे कर्जपुरवठा केला जात आहे.
यामध्ये महाराष्ट्र शासन पुरस्कृत मराठा समाज व इतर विविध जाती-जमातींसाठी व्याज परतावा योजना आहे. हे कर्ज शून्य टक्के दराने उपलब्ध होत आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम, अॅग्रो क्लिनिक अॅग्रो बिझनेस, या योजनासाठी शासनामार्फत ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळण्याची सोय आहे.
शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज योजना शून्य टक्के दराने बँकेमार्फत राबविली जात आहे. सोनेतारण कर्ज योजना, पगारदार व्यक्तींसाठी विविध कर्ज योजना, तसेच विविध शेतीपूरक उद्योगांसाठी कर्ज योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष श्री. पाटील यांनी केले.
बँकेचे सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे यांनी बँकेने कमी केलेल्या कर्जाच्या व्याजदराचा फायदा घेण्याचे आवाहन केले. या उपक्रमाबद्दल बँकेचे मार्गदर्शक संचालक आमदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, बँकेच्या संचालकांनी शुभेच्छा दिल्या.
‘व्यावसायिक, उद्योजक बना’
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनीही बँकेने जिल्ह्यातील शेतकरी व नव उद्योजकांनी शासन पुरस्कृत अनुदानित योजनेचा लाभ घेऊन नोकरीच्या मागे न धावता व्यावसायिक, उद्योजक बनून आर्थिक विकास साधावा, असे आवाहन केले आहे. बँकेने शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनेद्वारे मोफत अपघात विमा दोन लाख देणारी जिल्हा मध्यवर्ती बँक देशातील एकमेव बँक असून, इच्छुक खातेदारांनी बँकेच्या नजीकच्या शाखेत नोंदणी करावी, असे आवाहन केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.