
Chhatrapati Sanbhaji Nagar : मराठवाड्यातील ८७७ लघू मध्यम मोठ्या प्रकल्पांचा बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ३९ टक्क्यांवर आला आहे. त्यामध्येही ७४९ लघू प्रकल्पांत केवळ १७.८७ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.
मराठवाड्यात यंदा एप्रिल अखेरपर्यंत उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव आला असला तरी सर्वाधिक संख्येने असलेल्या लघू प्रकल्पांची अवस्था पाणीसाठ्याबाबत बिकट दिसते आहे. १२ मे अखेरपर्यंत मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांत सरासरी केवळ १७.८७ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.
दुसरीकडे मध्यम प्रकल्पांची स्थितीही फारशी समाधानकारक दिसत नाही. एकूण ७५ मध्यम प्रकल्पात सरासरी ३० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. ११ मोठ्या प्रकल्पात ४८ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमध्ये ४१ टक्के तर तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २७ बंधाऱ्यात ३८ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाकडून कळविण्यात आले.
उन्हाळ्यात पावसाळा जाणवल्याने पावसाळ्यात पाऊस वेळेवर न आल्यास टंचाईची स्थिती बिकट होऊ शकते. विविध जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून टंचाईचा आढावा घेतला जात असून, त्यावर उपाययोजनेचे नियोजनही केले जात असल्याचे दिसत आहे.
मोठे प्रकल्प ः मोठ्या ११ प्रकल्पांपैकी धाराशिव जिल्ह्यातील सीनाकोळेगाव प्रकल्पात केवळ २६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. निम्नदुधना प्रकल्पात ३७ टक्के, निम्नमनार ३८ टक्के, मांजरा ४३ टक्के, माजलगाव ३७ टक्के, जायकवाडी ४६ टक्के, येलदरी ५८ टक्के, सिद्धेश्वर ७० टक्के, ऊर्ध्व पेनगंगा ५५ टक्के, निम्न तेरणा ५० टक्के, तर विष्णुपुरी प्रकल्पात सर्वाधिक ६८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
मध्यम प्रकल्प ः मध्यम ७५ प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत सर्वांत कमी २६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापाठोपाठ धाराशिव जिल्ह्यातील १७ प्रकल्पांत २९ टक्के, नांदेडमधील ९ प्रकल्पांत ३० टक्के, जालन्यातील ७ प्रकल्पांत ३१ टक्के, लातूरमधील ८ प्रकल्पांत ३२ टक्के, परभणीतील २ प्रकल्पांत ३३ टक्के, तर बीडमधील सोळा प्रकल्पांत ३४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगरमधील २, जालना, धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येकी एक मध्यम प्रकल्प कोरडा पडला आहे.
लघू प्रकल्प ः ७४९ लघू प्रकल्पांपैकी हिंगोली जिल्ह्यातील २७ लघू प्रकल्पांत सर्वांत कमी केवळ ६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९७ प्रकल्पांत १४ टक्के, धाराशिव जिल्ह्यातील २०६ प्रकल्पांत १६ टक्के, परभणीमधील २२ प्रकल्पांत १७ टक्के जालनामधील ५७ प्रकल्पांत १७ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पांत १८ टक्के, लातूरमधील १३४ प्रकल्पांत २२ टक्के, तर नांदेड जिल्ह्यातील ८० प्रकल्पांत २४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.