
वाशीम : जिल्ह्यातील २८७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे (Gram Panchayat Election) निकाल जाहीर झाले. या निकालात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आघाडी घेतली असून, काँग्रेसने मालेगाव तालुक्यासह रिसोड तालुक्यात आपापले गड राखले. या निवडणुकीत भाजपच्या सरपंचाची संख्या खालावल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील एकूण ९ ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्यामुळे २७८ ग्रामपंचायतीसाठी रविवारी (ता. १८) प्रत्यक्ष मतदान झाले होते. वाशीम, मालेगाव, रिसोड, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा तालुक्यांतील ग्रामपंचायतींमध्ये सदस्यत्वासाठी तब्बल ५ हजार ४४७ उमेदवार रिंगणात होते. मंगळवारी (ता. २०) सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर प्रस्थापितांना हादरे देत युवकांच्या हातात गावाचा कारभार जाणार असल्याचे दिसून आले.
दुपारी तीन वाजेनंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक सरपंचपदे पटकावली. रिसोड तालुक्यात माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या जनविकास आघाडीने आपले गड कायम राखले. काँग्रेसला रिसोड व मालेगाव हे दोन तालुके वगळता इतर तालुक्यात नगण्य यश मिळाले. कारंजा, मानोरा व मंगरूळपीर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अव्वल राहिली. वाशीम तालुक्यात शिंदे गटाने आपली छाप पाडली.
युवकांच्या हातात कारभार
ग्रामीण भागात भाजपला संमिश्र यश मिळाले. ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आपला प्रभाव पाडता आला नाही. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामधे भारतीय जनता पक्षापेक्षा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची पकड अधिक घट्ट असल्याचे या निकालातून दिसून आले. सरपंचपद थेट जनतेतून असल्याने सरपंचपदाच्या उमेदवारांत युवकांचा भरणा सर्वाधिक होता. निकालानंतर प्रस्थापितांना हादरे देत युवकांनी गावाचा कारभार हातात घेतल्याचे दिसून आले. ही निवडणूक आगामी निकलाबाबत दिशानिर्देश करणारी मानली जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.