Amravati News : अमरावती जिल्ह्यातील शिवनी प्रकल्पाचे पाणी शेतात साचले. परिणामी सोयाबीन, तूर, कपाशी, संत्रा या पिकांचे नुकसान झाले. या आपदग्रस्तांना भरपाई मिळावी, अशी मागणी असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नागपुरातील विदर्भ सिंचन मंडळाच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या निवेदनानुसार, अमरावती जिल्ह्यातील सोनगाव, कळमगाव शिवारातील शेतात शिवणी प्रकल्पाचे पाणी पाझरले. हे पाणी शेतात साचल्यामुळे सोयाबीन, तूर, कपाशी, संत्रा या पिकांना सर्वाधिक फटका बसला.
या शेतकरी कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाण्याचा पाझर कमी व्हावा याकरिता उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्थानिक प्रशासनाकडे वारंवार निवेदन दिले. मात्र त्याची कोणतीच दखल घेण्यात आली नाही असाही आरोप करण्यात आला आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करण्यात यावे अशी देखील मागणी करण्यात आली होती. मात्र ती देखील सुरक्षित करण्यात आली. या प्रकारामुळे वैतागलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अखेरीस नागपुरातील विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या कार्यालयात धाव घेतली.
स्वाभिमानीच्या या आंदोलनामुळे अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. अखेरीस येथील प्रशासनाकडून देखील आंदोलनाची दखल घेण्यात येत नसल्यामुळे कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ, नागपूर जिल्हाध्यक्ष दयाल राऊत, प्रशांत शिरभाते, दिनेश आमले, प्रफुल्ल उमरकर यांचा आंदोलन सहभाग होता.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.