
Old Pension Scheme Update नगर ः जुन्या पेन्शनसाठी पुकारलेल्या संपात इतर कर्मचाऱ्यांसोबतच शिक्षकही सहभागी झाले. त्यामुळे बहूतांश शाळा बंद (School Closed) आहेत. मात्र परीक्षेचा काळ तोंडावर असताना शाळा बंद राहिल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल.
त्यामुळे आदर्श गाव हिवरेबाजार (Hivrebazar) येथील गावकरी शाळा सुरू ठेवण्यासाठी पुढे आले आणि त्यांनी शिक्षकांच्या गैरहजेरीत शाळा बंद पडू दिली नाही. चार दिवसांपासून येथील शाळेत गावांतील तरुण, सेवानिवृत्त कर्मचारी काम करत आहेत.
जलसंधारण, लोकसहभागातून गेल्या तीस वर्षांपासून विकास साधत राज्यात आणि देशात आदर्श निर्माण करणाऱ्या नगर जिल्ह्यातील आदर्शगाव हिवरेबाजारने पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने वेगवेगळे उपक्रम कायम ठेवले आहेत. अपत्ती, संकट असो की कोणतेही अडचण असो, या काळात गावांतील ज्येष्ठांसह तरुण एकत्र येऊन त्यावर मात करत असतात.
गेल्या चार दिवसांपासून जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्यात महसलू, जिल्हा परिषद, कृषी, पाटबंधारे, जलसंधारणसह सुमारे १८ विभागांतील कर्मचाऱ्यांनी सामूहिकपणे संप पुकारला आहे.
संपकरी जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडत आहेत. यात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी असल्याने नगर जिल्ह्यासह राज्यातील बहूतांश भागात शाळा बंद आहेत.
आता परीक्षेचा काळ आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू असून त्या झाल्या की अन्य वर्गाच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. संप किती दिवस सुरू राहिल हे निश्चित नाही.
त्यमुळे अधिक काळ शाळा बंद राहिली तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
शिक्षक संपावर असले तरी विद्यार्थ्यांसाठी गावांतील तरुण, सेवानिवृत्त कर्मचारी सरसावले आणि संपाच्या पहिल्या दिवसापासून ज्ञानार्जन सुरू केले. मार्च महिन्यात तोंडी व वार्षिक परीक्षेची तयारी सुरू असते.
संपामुळे आमच्या आमच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी संप काळात आम्हाला शिकविण्याचा घेतलेला निर्णय प्रेरणा देणार आहे, असे येथील विद्यार्थी यश ठाणगे याने सांगितले. हिवरेबाजारकरांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिक्षक त्यांच्या मागणीसाठी संप करत असले तरी आमच्या गावांतील विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या काळात शाळा बंदमुळे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही संप काळात शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांचे यासाठी योगदान आहे.
- पद्मश्री पोपटराव पवार, हिवरेबाजार, जि. नगर.
ऐन परीक्षेच्या वेळी शिक्षकांनी संप पुकारला. संपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी संप काळात विद्यार्थ्यांना शिकविण्यास प्रारंभ केला आहे.
- अर्चना ठाणगे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, हिवरेबाजार, जि. नगर.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.