
नगर : गावाचा कारभार हाकणाऱ्या गावकारभऱ्यांच्या निवडीसाठी आज (ता. १८) ग्रामपंचायत निवडणुकीचे (Gram Panchayat Election) मतदान होत आहे. यावेळी सरपंचाची (Sarpanch Election) निवड थेट जनतेतून होत असल्याने चुरस वाढली आहे. यावेळी तरुणांचा ग्रामपंचायत निवडणुकीत अधिक पुढाकार आहे. बहुतेक ठिकाणी दुरंगी लढती होत आहेत.
राज्यातील ३४ जिल्ह्यांत ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या सात हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यातील साधारण पन्नासपेक्षा अधिक गावांत बिनविरोध निवडणूका झाल्या आहेत. काही दिग्गज नेत्यांच्या गावांतील निवडणूका होत असल्याने तेथील वातावरण तापले आहे.
एका-एका मतदारांकडे पुन्हा, पुन्हा चाकरा मारल्या गेल्या. आता पंधरा दिवसाच्या प्रचारानंतर नेमका कोण जिंकतो, याकडे गावकऱ्यांचे लक्ष आहे. दहा वर्षांपूर्वी गावपातळीवरील राजकारणात वरिष्ठ नेते फारसे लक्ष घालत नव्हते. आता मात्र पक्षीय लोकांनी थेट सहभाग घेतला असल्याने उघडपणे राजकीय पॅनेल आहेत. बहुतांश गावांत तरुणांनी जुन्या जाणत्यांसमोर आव्हाने उभी केली आहेत. त्यामुळे ‘तरुण’ विरुद्ध ‘जुने जाणते’ असे चित्र आहे. मंगळवारी (ता. २०) निकाल जाहीर होईल.
मताचा दर वधारला
ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येण्यासाठी अलीकडच्या पाच वर्षांत मताचा दर ठरला जात आहे. थेट पक्षाचे निवडणूक चिन्ह वापरून ग्रामपंचायती निवडणूका होत नसल्या तरी राजकीय नेत्यांनी आपले पॅनेल उभे करून प्रत्यक्षपणे प्रचारात सहभाग घेत मोठ्या गावांत सभा घेतल्या. जिथे अधिक चुरस झाली तेथे मताचा दरही मागच्या वेळीपेक्षा वधारला असल्याचे एका कार्यकर्त्याने सांगितले.
ग्रामपंचायत निवडणुकीद्वारे तरुणांचा राजकारणात येण्याचा कल अधिक आहे. गावच्या ग्रामविकासासाठी काहीतरी करण्याची उमेद ठेवून सुशिक्षित तरुण पुढाकार घेत आहेत. त्यामुळे विकासाला चालना मिळत आहे. थेट सरपंच जनतेतून होत असल्याने मतदानानंतर होतकरूंना संधी मिळेल.
- ज्ञानेश्वर पठारे, युवक कार्यकर्ते, खातगाव टाकळी, जि. नगर.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.