
Water Conclave पुणे ः ‘‘पाणी हेच मानवी शरीर आणि संस्कृतीचाही केंद्रबिंदू आहे. त्यामुळे मानव जातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जलसंवर्धन (Water Conservation) हे आपले प्रमुख ध्येय बनवावे लागेल,’’ असे प्रतिपादन सत्संग फाउंडेशनचे संस्थापक व ख्यातकीर्त आध्यात्मिक गुरू श्री एम. यांनी काढले.
‘नद्यांचे पुनरुज्जीवन आणि जल व्यवस्थापन’ या विषयावर पुण्याच्या टीपटॉप इंटरनॅशनल हॉटेलमध्ये शनिवारपासून (ता.११) सुरू झालेल्या दोनदिवसीय जल महापरिषदेचे (वॉटर कॉनक्लेव्ह) उद्घाटन करताना ते बोलत होते.
व्यासपीठावर भारताचे जलपुरुष राजेंद्र सिंह, जलसंवर्धन विषयक राष्ट्रीय पातळीवरील सी-२० कृतिगटाचे प्रमुख समन्वयक विजय नांबियार, ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक व ‘एपी ग्लोबाले’चे चेअरमन अभिजित पवार, अमृतानंदनमयी मठाचे उपाध्यक्ष स्वामी अम्रितास्वरूपानंद पुरी होते.
या वेळी देशातील बारा प्रमुख नद्यांचे पाणी एकत्र करून प्रमुख पाहुण्यांनी जलकलशाचे पूजन केले. तसेच मानवी संस्कृतीच्या विकासासाठी जल संवर्धनाचा संकल्प केला.
गुरू श्री एम. म्हणाले, ‘‘पाण्याला आपल्या प्राचीन आध्यात्मिक तत्त्वांमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. या तत्त्वांच्या शिकवणीवर आपली संस्कृती वाटचाल करते आहे.
या वसुंधरेवरील सर्व मानवजात एक आहे. त्यामुळे आपल्या आस्तित्वासाठी आधी पाण्याला वाचवावे लागेल. पाणी नाही तर जीवन नाही.
क्ष नसतील तर पाणी नाही, हे तत्त्व आपण समजून घ्यावे. मानवी संस्कृती ही शरीराप्रमाणे एकमेकांवर अवलंबून असून, पाणी हे या संस्कृतीचे रक्त आहे. त्यामुळेच वॉटर कॉनक्लेव्ह उपक्रम महत्त्वाचा ठरतो आहे.’’
जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी मरणासन्न नद्यांचा तळमळीने इतिहास मांडला. ते म्हणाले, ‘‘देशातील नद्या आजारी आहेत. मात्र त्यांच्यावर चुकीचे धोरणात्मक उपाय सुरू आहेत.
नद्यांना प्रदूषण, शोषणाचा एकप्रकारे कर्करोग झालेला असताना उपचार मात्र भलतेच म्हणजेच सौंदर्यविकाराचे किंवा दंतरोगाचे केले जात आहेत.
वेदांना, नद्यांना रोखू नका, असे सांगितले आहे. मात्र आधुनिक शिक्षण पद्धत नद्यांना रोखणारी व ओरबाडणारी आहे. ती समाजाऐवजी स्वार्थ व कॉर्पोरेट व्यवस्थेला चालना देणारी आहे.
प्राचीन भारतीय विद्येने पाणी हेच देव, जीवन व ब्रह्मांड निर्माण करणारे तत्त्व असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नदी संवर्धनासाठी सध्याच्या शिक्षण पद्धत नव्हे; तर प्राचीन विद्येची तत्त्वे आपण स्वीकारायला हवीत.’’
श्री. नांबियार म्हणाले, की भारताच्या ‘जी-२०’ कार्यक्रमातील बळकट करण्यासाठी ‘सी-२० नागरी गट’ विविध उपक्रम राबवतो आहे. पाणी हेच जीवन असल्याचे तत्त्व आम्ही स्वीकारले आहे.
या परिषदेच्या निमित्ताने देशातील विविध नद्यांच्या खोऱ्यांमध्ये काम करणाऱ्या संस्थांना एकत्र आणून मंथन घडत असल्याचा आनंद होतो आहे. दुर्देवाने जगातील स्वच्छ पाण्याच्या स्रोतांपैकी केवळ चार टक्के भाग आपल्या देशात उरला आहे.
उद्योग, शेती क्षेत्रातून पाण्याची मागणी वाढत असून, त्यातून भूगर्भातून पाण्याचा होणारा अतोनात उपसा, जल जैवविविधेतेची होणारी हानी आणि जलप्रदूषण या गंभीर समस्या वेगाने वाढत आहेत. त्यामुळे समूह मंथन व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे जल संवर्धनाचे कालबद्ध उपाय अमलात आणण्याची नितांत गरज आहे.’’
महापरिषेदेच्या पहिल्याच दिवशी देश-विदेशांतील नामवंत तज्ज्ञ, अभ्यासकांनी नदी पुनरुज्जीवन व जल व्यवस्थापनावर चार चर्चासत्रे झाली.
त्यातून अभ्यासपूर्ण उदाहरणे मांडली गेली. तसेच शास्त्रीय सादरीकरण झाले.
आज (ता. १२) पुन्हा या उदाहरणांमधून महत्त्वाचे निष्कर्ष काढले जातील व जल व्यवस्थापनावर प्रभावी उपाय सूचवित महापरिषदेचा समारोप होणार आहे.
लोकसमूहातून बांधली १३,८०० जलाशये
जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी सध्याचे आधुनिक शिक्षण आणि अभियांत्रिकी व्यवस्था पाण्याचे शोषण करणारी असल्याचे सांगून या व्यवस्थेवर सडकून टीका केली.
‘‘जलसंवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आता देशाचा ३० टक्के जमीन पूरप्रवण, तर ६० टक्के जमीन दुष्काळ क्षेत्रात आली आहे. या समस्येवर सरकारी उपाय, आधुनिक अभियांत्रिकी कुचकामी ठरते आहे.
आता केवळ समूहांद्वारे स्थानिक विकेंद्रित जल व्यवस्थापनाद्वारेच ही समस्या हाताळता येईल. आम्ही समूहातून १३,८०० जलाशये बांधली. १३ नद्या बारमाही केल्या व १७ लाख लोकांना रोजगार दिला.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.