
Pune News : खडकवासला धरणातून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन एक मे पासून सुरू करण्यात आले असून, ते १५ जूनपर्यंत सुरूच राहणार असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. सद्यःस्थितीत कालव्यातून १०५४ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. हे आवर्तन सुमारे चार ते साडेचार टीएमसी इतके असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शेतीला आवर्तन सोडून शहराला पिण्यासाठी १५ जुलैपर्यंत पुरेल इतका साठा असल्याने आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ जुलैपर्यंत ४.५३ टीएमसी पाणी पुणे पालिकेसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.
शहराचा पाणीपुरवठा प्रत्येक गुरुवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शेती आवर्तनासाठी पाटबंधारे विभागाकडून कोणतीही कपात न करता पुरेसे पाणी मिळणार आहे.
सध्या खडकवासला साखळीत एकूण ९.६५ टीएमसी म्हणजे ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. यंदा २५ डिसेंबर २०२२ ते ६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत रब्बी आवर्तनात ३.८१ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर आता खडकवासला धरणातून पहिले आवर्तन १ मार्चपासून सुरू करण्यात आले आहे.
याकरिता नवीन मुठा उजवा कालव्यातून १०५४ क्युसेक वेगाने ग्रामीण भागाला पाणी देण्यात येत होते. या उन्हाळी आवर्तनात पाच टीएमसी पाणी सोडण्यात आले. तसेच जलसंपदा विभागाकडून दुसरे उन्हाळी आवर्तन १ मे पासून सुरू असून, हे आवर्तन सुमारे ४५ दिवस चालणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली.
पुणे शहराला दरमहा १.२५ ते १.५० टीएमसी पाण्याची गरज असते. महापालिका दररोज धरणातून तब्बल १४०० एमएलडी पाणी उचलते. ग्रामीण भागाला दुसरे उन्हाळी आवर्तन घेतल्यास शहरात पाणी कमी पडण्याची भूमिका महापालिकेने मांडली होती. ऐन उन्हाळ्यात दुसरे आवर्तन न घेतल्यास ग्रामीण भागात रोष निर्माण होण्याची शक्यता जलसंपदाने मांडली होती.
खडकवासला साखळीत धरणनिहाय पाणीसाठा, टक्के :
धरण -- पाणीसाठा, टीएमसी -- टक्के
टेमघर -- ०.२४ -- ६
वरसगाव -- ५.७५ -- ४४
पानशेत -- २.५४ -- २३
खडकवासला -- १.१२ -- ५६
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.