
Takari Irrigation Scheme News : ताकारी योजनेचे यंदाचे दुसरे पाणी आवर्तन (Water Cycle) बुधवारपासून (ता. १५) सुरू होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजन डवरी (Rajan Dwari) यांनी ‘सकाळ’ला दिली.
यापूर्वीचे पहिले आवर्तन ६ डिसेंबर ते १४ जानेवारीअखेर सलग ४० दिवस सुरू होते. ते मुख्य कालव्याच्या शेवटी किलोमीटर १४४ अखेर मिरज तालुक्यातील सोनी-भोसेपर्यंत पोहोचले होते.
सध्या ताकारी उपसा जलसिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात वाढलेल्या सिंचनक्षेत्रासाठी (Irrigation) जमिनीतून प्रचंड पाणी उपसा होत आहे. त्यामुळे काही भागांत पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. जमिनीतील पाणी पातळी खालावण्यापूर्वीच ताकारी योजना सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
त्यास अनुसरून ताकारी योजनेचे दुसरे आवर्तन बुधवारपासून सुरू होणार आहे. पहिल्या आवर्तनाचे पाणी मंगळवारी (ता. १४) बंद झाल्यानंतर नियमित बारमाही पिकांसह रब्बी हंगामातील पिकांसाठी जमिनीतून दैनंदिन भरमसाठ पाणी उपसा होऊ लागला आहे.
त्यामुळे ओढे आटले आहेत, विहिरींनीही तळ गाठला आहे. उथळ भागातील विहिरी सांगळ्यावर आल्या असून, विंधन विहिरींचे पाणीही कमी झाले आहे.
शिवाय बऱ्याच ठिकाणी ऊस लागणी व उन्हाळी पिकांची लावणी सुरू झाली आहे. या पिकांना पाणी कमी पडू नये, यासाठी ‘पाटबंधारे’ने तयारी करून ताकारी योजना सुरू करण्याचे नियोजन केले आहे, जेणेकरून सर्वत्रच टंचाई निर्माण झाल्यानंतर पाणी सोडल्यास शेतकरी आणि पाटबंधारे कर्मचाऱ्यांमध्ये होणारे वाद टाळता येतील.
पाटबंधारे विभागाच्या पाणी सोडण्याच्या नियोजनामुळे उन्हाळी पीकक्षेत्रात वाढ होणार आहे. बहुतांश गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. पाणी सर्व शेतकऱ्यांना मिळेपर्यंत बंद होणार नाही, अशी ग्वाही अभियंता डवरी यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.