
सोलापूर : उजनी धरणात (Ujani Dam) सध्या १११ टक्के पाणीसाठा (Water Stock) आहे. रब्बी पिकांसाठी (Rabi Crop Irrigation) उजनीतून पहिले आवर्तन २० जानेवारीनंतर सोडले जाणार आहे. तसेच २५ मार्च ते २५ एप्रिल आणि तेथून पुढे २० मेपर्यंत एकच मोठे आवर्तन सोडले जाईल. त्यावर कालवा सल्लागार समितीत अंतिम निर्णय होणार आहे.
उजनी धरण जिल्ह्यासाठी वरदान ठरले असून, रब्बीच्या जिल्ह्यात खरीप पिकांखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील शेतीला कॅनॉलद्वारे पाणी मिळते. बार्शी उपसा सिंचन योजना, शिरापूर, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून आणि बोगद्यातून देखील पाणी वितरीत होते. धरणावरून जिल्ह्यातील जवळपास पावणेतीन लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
सोलापूर शहराला देखील उजनीतूनच पाणीपुरवठा होतो. त्याशिवाय बारामतीसह सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसींना आणि लातूर, उस्मानाबाद शहरालाही उजनीतूनच पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यात शेती व जनावरांची तहान भागविण्यात उजनीची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या कमी होऊन हरितक्रांतीची मुहूर्तमेढ उजनीनेच रोवली.
त्यामुळेच राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूरचा नावलौकिक देशभरात झाला. मागील तीन-चार वर्षांत उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणी पुरवठ्यासाठी एकही टॅंकर लागलेला नाही, तेही उजनीमुळेच. यंदा पावसाळ्यात उजनी धरणावरील जलविद्युत केंद्रातून १.५५ कोटी वीजनिर्मिती व्हावी, असे टार्गेट दिले होते. पण, पावसाळ्यात तब्बल तीन कोटी युनिट वीज तयार करण्यात आली. ही आतापर्यंतची सर्वाधिक वीजनिर्मिती ठरली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.