
सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पुरेसा पाऊस (Insufficient Rain In Solapur District) नसतानाही, पुणे जिल्ह्यातील पावसावर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी (Water Level Of Ujani Dam) ७५ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणातील या पाणी साठ्यामुळे (Water Storage) सोलापूर जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी जिल्ह्याला आजही दमदार पावसाची गरज आहे.
पुणे जिल्ह्यात पंधरवड्यापूर्वी झालेल्या पावसामुळे खडकवासलासह सर्वच धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला. त्यातील अतिरिक्त पाणी पुढे उजनी धरणाकडे सोडण्यात येत असल्याने सोलापूर जिल्ह्यात पुरेसा पाऊस नसतानाही उजनी धरणाने मात्र ७५ टक्क्यांची पाणी पातळी गाठली आहे. विशेष म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरण उणे पातळीत होते. पण पाण्याच्या सलग विसर्गामुळे धरण ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचले.
जिल्ह्यात आतापर्यंत २०० मिलिमीटर पाऊस झाला आहे, शिवाय तो सरसकट सगळीकडे नाही. त्यामुळे धरणातील पाण्यामुळे काहीसा दिलासा मिळणार असला, तरी खरिपातील पिकांसाठी अद्यापही दमदार पावसाची गरज आहे. वरच्या धरणाकडून उजनी धरणामध्ये आधी ५० हजार क्युसेक, त्यानंतर २५ हजार क्युसेक असा विसर्ग धरणात सोडण्यात येत होता. सध्या विसर्गात काहीशी घट झाली असली, तरी विसर्गात मात्र सातत्य आहे. त्यामुळे संथपणे पाणीपातळीत वाढ होत आहे. शुक्रवारीही (ता. २९) धरणामध्ये दौंडकडून ८९२८ क्युसेक इतके पाणी सोडले जात होते.
एकूण पाणीसाठा शंभर टीएमसीवर
उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्यामुळे शुक्रवारी (ता. २९) धरणात एकूण पाणीपातळी ४९५.६६० मीटरपर्यंत पोहोचली. त्यात एकूण पाणीसाठा तब्बल १०४.४ टीएमसीपर्यंत राहिला. तर त्यापैकी उपयुक्त साठा ४०.३८ टीएमसी एवढा राहिला. तर या पाण्याची टक्केवारी तब्बल ७५.३७ टक्क्यांवर पोहोचली. विशेष म्हणजे अवघ्या पंधरवड्यात धरणात शंभर टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.