
वैजापूर ः वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी नांदूर मधमेश्वर जलदगती (Nandur Madhmeshwar Irrigation Project) कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी गुरुवारी (ता.१२) सकाळी वैजापूर तालुक्याच्या हद्दीत ८०० क्यूसेक वेगाने दाखल झाले आहे.
पायथा ते माथा नियमानुसार आदी गंगापूर तालुक्याला कालव्याचे पाणी (Canal Water) सोडण्यात येणार असून त्यानंतर वैजापूर व कोपरगावला पाणी देण्यात येणार आहे. हे आवर्तन २१ दिवस सुरु राहणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) दिली आहे.
रब्बी हंगाम असल्याने विशेषकरून गहु, हरभरा, ज्वारी, मका,ऊस पिकांसाठी पाण्याची आवश्यकता आहे. त्यात दिवसा उन्हाचा तडाखा व रात्री थंडी वाढल्याने वैजापूर व गंगापूर तालुक्यातील नांदूर-मधमेश्वर कालवा क्षेत्रातील गावांना सिंचनासाठी पाणी टंचाई जाणवत आहे.
त्यामुळे येथील पाटबंधारे विभागाने नाशिक पाटबंधारे विभागाला पत्र पाठवून आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी केली. त्यानुसार बुधवारी नांदूर-मधमेश्वर जलदगती कालव्यातून पाणी सोडण्यात आले.
हे पाणी गुरुवारी सकाळी वैजापूरच्या हद्दीत दाखल झाले. तब्बल २१ दिवस चालणाऱ्या या आवर्तनातून वैजापूर, गंगापूर व कोपरगाव या तिन्ही तालुक्यातील १०२ गावांना पाणी मिळणार आहे.
रब्बी हंगामासाठी आवर्तन
रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी तातडीने सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केल्यानंतर नाशिक विभागाशी बोलणी केल्यानंतर बुधवारी पाणी सोडण्यात आले असून गुरुवारी वैजापुरात पाणी दाखल झाले असून रात्री गंगापूर हद्दीत दाखल होईल, असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राकेश गुजरे यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.