
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : रब्बी हंगामासाठी डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू) (Dimbhe Dam) जलाशयातून पाणी नुकतेच सोडण्यात आले आहे. डाव्या व उजव्या अशा दोन्ही कालव्यास धरणातून ८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे याचा फायदा आंबेगाव, शिरूर तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.
धरणांतील पाण्याची उपयुक्त पाण्याची क्षमता १२.४९ टीएमसी एवढी आहे. पावसाळ्यात पश्चिम भागात झालेल्या पावसामुळे धरणे भरून वाहिली. सध्या धरणांत ११.५९ टीएमसी म्हणजेच सरासरी ९२.७९ टक्के पाणीसाठा आहे. परंतु रब्बी हंगाम सुरू असल्याने आंबेगाव, शिरूर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसाठी धरणांतून पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार पाटबंधारे विभागाकडून नुकतेच पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना ‘टेल टू हेड’ या पद्धतीने पाण्याचे वितरण करण्यात येईल.
आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणापासूनचा पूर्व भाग आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हरभरा, गहू, ज्वारी, सूर्यफूल, मका, फळबागा घेतल्या आहेत. याशिवाय कांदा, बटाटे, भाजीपाला याचे उत्पादन घेतले जाते. सोडलेल्या पाण्याचा कालावधी निश्चित नसल्याने शेतकरी वर्ग संभ्रमात असून मे महिन्यापर्यंत पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.