
ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या (Loksabha Election) मैदानात पूर्ण ताकदीने उतरणार असून राज्यात हातकणंगलेसह पाच ते सहा लोकसभेच्या जागा स्वतंत्रपणे लढविणार असल्याची घोषणा राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली.
कोणत्या जागा स्वाभिमानी लढवणार त्याचा निर्णय राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अभ्यास शिबिर आंबा (ता. शाहूवाडी) येथे झाले. त्या वेळी शेट्टी बोलत होते.
शेट्टी म्हणाले, की आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो आहेत. भाजपमधून या अगोदरच बाजूला झालो आहोत.
शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग, बेरोजगारी, समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने संघर्ष चालू आहे. रस्त्यावरची लढाई आमची संपलेली नाही. केंद्र व राज्य सरकारचा कारभार हा लोकशाहीच्या विरोधात आहे.
लोकांची मुंडकी पिरगाळून तुम्हाला राज्य करता येणार नाही, असे ठणकावून सांगणे गरजेचे आहे. मी मांडलेला हमीभावाचा कायदा अद्याप प्रलंबित आहे. केंद्र जोपर्यंत हमीभावाचा कायदा करत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही.
शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे आहेत. त्यावर कोणत्याच सभागृहात चर्चा केली जात नाही. त्यासाठी शेतकरी प्रश्नावर बोलणारे लोकप्रतिनिधी सभागृहात निवडून जाणे गरजेचे आहे.
या वेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्ड्यान्नावर, जनार्दन पाटील, संदीप राजोबा, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.