ब्रिटिश काळात कापसाच्या खरेदी-विक्रीचे केंद्र राहिलेल्या यवतमाळ बाजार समितीत अलीकडील काळात कापसासह सोयाबीनचीही आवक वाढली आहे. कापूस आणि सोयाबीन विक्रीसाठी शेतकरी येथील बाजार समितीला पसंती देतात. सन २०१७-१८ या वर्षात कापसाची दोन लाख ६५ हजार ५४९ क्विंटल तर सोयाबीनची तीन लाख ४७ हजार ३८० क्विंटल आवक नोंदविण्यात आली. विदर्भातील अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती हा भाग कपाशीच्या उत्पादकतेला पोषक असल्याची बाब त्या वेळी ब्रिटिशांनी हेरली. त्यानंतर लागवडीला प्रोत्साहन देत कापसाच्या वाहतुकीसाठी रेल्वेचे जाळे विणण्यात आले. कापूस लागवड क्षेत्र असलेल्या अकोला, यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांना ‘कॉटन सिटी’ अशी ओळख यामुळेच मिळाली. कापूस खरेदीचे व्यवहार होत असल्याने येथील बाजार समित्यादेखील फार पूर्वीच अस्तित्वात आल्या, अशी माहिती सहायक सचिव विजय वाढई यांनी दिली. बाजार परिसरातील सुविधा शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बाजार समिती प्रशासनाकडून तसेच नवनियुक्त संचालक मंडळाकडून विविध सुविधा देण्यात येत आहेत. प्रस्तावित सुविधांमध्ये लिलावगृह, आरओ वॉटर प्लॅंट, दोन वजन काटे (१० व ५० टन क्षमतेचे) आदींचा समावेश असल्याचे सभापती रवींद्र ढोक यांनी सांगितले.
बाजार शुल्कात केली कपात शेतकरी हित समोर ठेवत बाजार शुल्क कमी करण्यात आले आहे. नियमानुसार एक रुपया सेस तर पाच पैसे ‘सुपरव्हिजन’ शुल्क आकारले जाते. यवतमाळ बाजार समितीने पाच डिसेंबर, २०१६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ७५ पैसे बाजार शुल्क तर पाच पैसे ‘सुपरव्हिजन’ शुल्क अशी ८० पैसेच आकारणी होते. पाच रुपयांत रुचकर भोजन विदर्भात झुणका भाकर, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि झणझणीत जेवण प्रसिद्ध आहे. बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी अशाच रुचकर जेवणाची सोय अवघ्या पाच रुपयांत उपलब्ध केली आहे. त्यास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद असून अवघ्या आठ महिन्यांत दहा हजारांवर शेतकऱ्यांनी या जेवणाचा लाभ घेतला आहे. बाजाराचे हस्तांतर भाजी बाजाराचे नियंत्रण पूर्वी नगरपालिकेकडून व्हायचे. फेब्रुवारी २०१६ नंतर त्याचे हस्तांतर बाजार समितीकडे झाले. विठ्ठलवाडी परिसरात भरणाऱ्या या भाजी बाजारात ९० गाळे बांधण्यात आले. भाजीपाला व्यावसायिकांकडून नियमानुसार सेसची आकारणी होते. तारण योजना बनविली वैशिष्ट्यपूर्ण शेतमाल दरातील सरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांद्वारे शेतमाल तारण ठेवण्यावर भर दिला जातो. दरातील तेजीनंतर शेतकरी माल विक्रीचा निर्णय घेतात. बाजार समितीने अनेक वैशिष्ट्ये असलेली शेतमाल तारण योजना राबविली आहे. त्यामध्ये गोदामात तारण म्हणून ठेवलेल्या शेतमालाचे भाडेशुल्क बाजार समिती भरते. गोदामातून माल विक्रीसाठी नेताना होणाऱ्या वाहतूक खर्चाची भरपाई बाजार समितीच करते. नेर, बाभूळगाव, कळंब, आर्णी, देवळी, राळेगाव या भागांतील शेतकरी या बाजार समितीत माल तारण ठेवण्यासाठी उत्सुक आहेत. बाजार समितीच्या कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याची तरतूद करावी, या प्रस्तावाला पणन मंडळाने मान्यता दिली आहे. बाजार समितीमधील कापूस आवक
सन २०१७-१८ मधील आवक
यवतमाळ बाजार समिती दृष्टिक्षेपात
बाजार समितीचा ताळेबंद (वर्ष २०१७-१८) उत्पन्न- २ कोटी ६० लाख ११ हजार १४२ रू. नफा- ६९ लाख, १२ हजार ५३१ रू. प्रतिक्रिया बाजार समितीत शासकीय तूर खरेदीला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना काही वेळा मुक्कामी राहावे लागते. त्या वेळी बाजार समिती आपलेपणा दाखवित निवास आणि भोजनाची व्यवस्था निशुल्क करते. हा आदर्श अन्य बाजार समित्यांनीही जपण्याची गरज वाटते.' -देविदास कुरई पांढरी, ता. यवतमाळ "शेतमाल तारण योजनेतील भाडे शुल्क खर्च उचलत बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अशा प्रकारच्या छोट्या योजनांमधून शेतकऱ्यांचा मोठा फायदा होत असल्याने त्यांचे आम्ही स्वागतच करतो.' - सुरेस ढंबारे येराबारा, ता. यवतमाळ "बाजार समिती परिसरात सद्यस्थितीत काही असुविधा आहेत. नव्या संचालक मंडळाकडून त्या दूर होतील, अशी अपेक्षा आहे. - महादेव चांगले वडकिंडी, ता. यवतमाळ, जि. यवतमाळ
संपर्क- विजय वाढई- ८७९३६०३४९४ सहायक सचिव
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.