परभणी ः ‘‘‘जल जीवन मिशन’ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४ हजार ६८ कुटुंबांना नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ५ हजार १२२ कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली आहे. उर्वरित उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल’’, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिली.
टाकसाळे म्हणाले, ‘‘केंद्र शासनाच्या वतीने सुरू असलेल्या ‘जल जीवन मिशन’ या महत्वकांक्षी कार्यक्रमाविषयीची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये व्हावी. गावात लोकचळवळ निर्माण व्हावी, या हेतूने प्रजासत्ताक दिनी आज (ता.२६) आयोजित ग्रामसभांमध्ये कोविडचे नियम पाळून ग्रामस्थांना माहिती देण्यात येईल. जिल्ह्यात या कार्यक्रमाची अंमलबजावणी स्वच्छ भारत मिशन आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येईल.’’
‘‘‘जल जीवन मिशन’ अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध व पुरेसे पाणी देण्यात येईल. गावांमध्ये हे मिशन राबविण्यासाठी ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांची प्रमुख जबाबदारी असेल. ग्रामस्थांनी ‘जल जीवन मिशन’ योजना राबविणे, चालविणे, देखभाल दुरुस्तीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. गावातून नळजोडणीच्या मोहिमेला गावकऱ्यांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण व्हावी म्हणून लोकवर्गणीची तरतूद करण्यात आली,’’ असेही त्यांनी सांगितले.
‘‘लोकवर्गणी आर्थिक किंवा श्रमदानाच्या स्वरूपात असेल. नळ जोडणीची योजना पूर्ण झाल्यानंतर त्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी हा निधी वापरण्यात येईल. नळजोडणीच्या कामासाठी ग्रामपंचायतींमधील उपलब्ध १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा उपयोग करायचा आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने या कामामध्ये सक्रिय व प्राधान्याने सहभाग घेणे गरजेचे आहे’’, असे टाकसाळे यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.