‘मामा’ तलाव रुतले गाळात 

सिंचनाचे सोडा जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. एकेकाळी हजारो एकर शेती सिंचित करण्याची क्षमता असलेले मालगुजारी तलाव शासन व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे निरुपयोगी ठरले. शिवनीबांध, कुंभली, गुढरी येथील लघू प्रकल्पाशिवाय जुन्या तलावांची संख्या मोठी आहे.
‘Mama’ lake became muddy
‘Mama’ lake became muddy

साकोली, जि. भंडारा : भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील २,२६७ माजी मालगुजारी तलावांपैकी १,६०२ तलाव भंडारा जिल्ह्यात आहेत. पूर्वी अशा तलावांची मालकी परिसरातील मालगुजारांकडे होती. मात्र १९५० च्या संपत्ती हक्क कायद्यानुसार मामा तलाव शासनाच्या ताब्यात गेले. बर्वे आयोगाच्या शिफारशीनुसार दुरुस्ती व पाणीवाटपावर पाणीकर आकारायचे ठरविले. याला त्या वेळी जनतेने विरोध केला. मात्र शासनाने त्याची दखल घेतली नाही. तेव्हापासून या तलावांची दुरवस्था सुरू झाली. 

जिल्हा परिषदेला लघू पाटबंधारे विभागाकडे आलेले मालगुजारी तलाव ‘रोहयो’च्या कामापुरते मर्यादित राहिले. पावसाळ्यात भरलेला तलाव दोन महिन्यांत रिकामा होतो. सिंचनाचे सोडा जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. एकेकाळी हजारो एकर शेती सिंचित करण्याची क्षमता असलेले मालगुजारी तलाव शासन व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे निरुपयोगी ठरले. शिवनीबांध, कुंभली, गुढरी येथील लघू प्रकल्पाशिवाय जुन्या तलावांची संख्या मोठी आहे. 

एकोडी, चांदोरी, आमगाव, वलमाझरी, पिंडकेपार, पाथरी, सावरगाव, खंडाळा, उमरी, लवारी, सितेपार, सानगडी, केसलवाडा या गावांसह साकोली तालुक्यात तब्बल २४८ मालगुजारी तलाव आहेत. परंतु कालव्यांची अपूर्ण कामे, वाढते अतिक्रमण, गाळाचा उपसा न होणे यामुळे तलाव बिनकामाचे ठरले. बहुतांश नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेतीच असल्याने तलावांच्या उद्धारावरच येथील अर्थकारण अवलंबून असल्याने हा प्रश्न प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे. 

सर्व विभागांकडून हवे नियोजनबद्ध काम  तलाव खोलीकरणासाठी कृषी, वन, महसूल व वित्त विभागाने समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. अनेक तलाव वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने तलावांचे काम वन विभागाकडून अडवले जाते. साकोली तालुक्यातील वडेगाव खांबा येथील तलावांचे काम वनविभागाने तीस वर्षांपासून थांबविले. अद्याप कालव्याची कामे अपूर्ण आहेत. घानोड, भुरेजंगी, जांभळी, रेंगेपार येथील तलावांचे खोलीकरण झाल्यास तालुका सुजलाम् सुफलाम् होईल. तलावांच्या खोलीकरणासोबतच तलावातून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत जाणारे नहर बनणे गरजेचे आहे. नहरापासून प्रत्येक बांधापर्यंत जाणाऱ्या कॅनॉलचे बांधकाम झालेले नसल्याने पाणी जमिनीत मुरते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. शासनाच्या सर्व विभागांनी नियोजनबद्धरीत्या काम केले तरच शेतकऱ्यांना वर्षभर पाणी मिळेल.

...अन्यथा तलाव फक्त नकाशावर  सिंचन क्षमता कमी झाल्याने मामा तलाव दोन महिन्यांत रिकामे होतात. शासनाने तलाव ताब्यात घेतले; मात्र देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. खोलीकरण केले तरच तलावांचे आणि परिसरातील नागरिकांचे भाग्य उजळू शकते. अन्यथा, तालुक्यातील तलाव नकाशावर राहतील, यात शंका नाही. लघुपाटबंधारे उपविभाग साकोलीअंतर्गत साकोली तालुक्यात २४८, लाखांदूर १९० व लाखनी तालुक्यात १२७ मामा तलाव आहेत. यापैकी यंदा गाळ काढून तलाव खोलीकरण करण्यात आलेल्या तलावांची संख्या १५६ आहे. उर्वरित तलावांचे काम कधी होणार, हा प्रश्‍न आहे. शासनाच्या योजनेनुसार तलावातील गाळ काढणे, खोलीकरणाची कामे करणे आवश्यक आहे.

राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे मामा तलावांची दुर्दशा होत आहे. साकोली विधानसभेचा आमदार असताना २०१६ ते २०२० या काळात २५० कोटी रुपये खर्चून भंडारा जिल्ह्यातील तलावाचे खोलीकरण केले. परंतु काँग्रेसशासित काळात खोलीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याने पूर्वजांनी खास करून कोहळी समाजाने केलेल्या मामा तलावाची वाताहात झाली. साकोली तालुक्यातील अर्थकारण मामा तलावांवर अवलंबून आहे. त्यामुळे नियोजनबद्धरीत्या तलावाचे खोलीकरण करण्यात यावे.  - बाळाभाऊ काशिवार, माजी आमदार, साकोली विधानसभा क्षेत्र

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com