कोरडवाहू, बागायतीसाठी हेक्टरी १० हजार मदत

अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या दु:खावर फुंकर घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता.२३) १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलेे.
Uddhav thakarey
Uddhav thakarey

मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या दु:खावर फुंकर घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता.२३) १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलेे. यातून दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत कोरडवाहू आणि बागायती जमिनीसाठी प्रति हेक्टरी १० हजार तर फळबागांसाठी २५ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.  पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री ॲड अनिल परब सहभागी झाले होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, राज्य सरकारच्या तिजोरीत पैशाची ओढाताण आहे, पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा आमचा शब्द आहे. केंद्र सरकारकडे राज्याचे एकूण ३८ हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. त्यात निसर्ग चक्रीवादळाचे १ हजार ६५ कोटी, पूर्व विदर्भात आलेल्या पुरासंदर्भात ८०० कोटी आणि जीएसटी परताव्याचा समावेश आहे.   याबाबत केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करुनही ही रक्कम अद्याप प्राप्त झाली नाही. त्याचबरोबर राज्यात ऑगस्टपासून अतिवृष्टी सुरु आहे, पण अजूनही पाहणीसाठी केंद्राचे पथक राज्यात आले नाही. राज्य सरकारने दोन तीनदा केंद्र सरकारला विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की जिरायत, बागायत जमिनीसाठी ६८०० प्रति हेक्टर आणि फळपिकांसाठी १८,००० रुपये प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे, त्यामुळे कोरडवाहू आणि बागायती जमिनीसाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही मदत दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत मिळणार आहे. म्हणजे ५ एकर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना २० हजार रुपयांची मदत मिळेल.  अतिवृष्टीमुळे फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे फळबागांसाठी प्रति हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे. दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत ही मदत मिळणार आहे. मृत व्यक्तीच्या वारसांना, मयत पशुधनासाठी आणि घर पडझडीसाठीही भरीव मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.

दिवाळीपर्यंत मदत देणार शेतपिकांचे झालेले नुकसान, खरडून गेलेली जमीन, पडलेली घरे, रस्ते, वीजेचे पडलेले खांब या सर्व बाबींसाठी ही मदत असेल. दिवाळीपर्यंत ही मदत दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

असे आहे पॅकेज (कोटींत)  ५५००  शेती, घरांसाठी २६३५  रस्ते आणि पूल  ३०० नगरविकास २३९ महावितरण ऊर्जा १०२ जलसंपदा १ हजार  ग्रामीण रस्ते, पाणीपुरवठा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com