राज्यातील द्राक्ष बागांना १० हजार कोटींचा फटका

राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने पूर्व हंगामातील काढणीला आलेली द्राक्ष आणि फुलोरावस्थेत असलेल्या अशा एकूण ५० टक्के बागा बाधित झाल्या आहेत.
10,000 crore hit vineyards in the state
10,000 crore hit vineyards in the state

सांगली ः राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने पूर्व हंगामातील काढणीला आलेली द्राक्ष आणि फुलोरावस्थेत असलेल्या अशा एकूण ५० टक्के बागा बाधित झाल्या आहेत. सुमारे दोन लाख एकरांवरील बागांचे १० हजार कोटींचे आर्थिक नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज राज्य द्राक्ष बागायदार संघाने व्यक्त केला आहे. 

राज्यात चार लाख एकर द्राक्षाचे क्षेत्र आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष बागा वाढविल्या. अनेक भागात फळछाटणी केलेल्या बागांची स्थिती फुलोरावस्थेत आहे. तर काही ठिकाणी पोंगा अवस्थेत बागा पाहायला मिळत आहेत. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने फुलोरावस्थेत असलेल्या बागांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे फूलगळ, फळकूज या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तर डाऊनी आणि भुरी रोगाचाही मोठा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. 

ख्रिसमस सणाला द्राक्ष बाजारपेठेत विक्रीस यावीत यासाठी आगाप फळ छाटणी घेतात. या दरम्यान, अपेक्षित दर मिळतात. त्यामुळे आगाप फळछाटणी शेतकरी घेतात. त्यादृष्टीने शेतकरी बागांचे नियोजन करतात. राज्यातील नाशिक, आणि सांगली या दोन जिल्ह्यांत पूर्वहंगामातील द्राक्षे काढणीच्या स्थितीत आली आहेत. या बागाही पावसाच्या तडाख्यातून सुटलेल्या नाहीत. पावसामुळे मणी क्रॅकिंग होऊ लागले आहेत. काही ठिकाणी आगाप फळछाटणी घेतलेल्या द्राक्षे काढणीला आली आहेत. मात्र, पावसामुळे काढणीला आलेल्या बागांचे मोठे नुकसान झाले असल्याचे चित्र आहे.

द्राक्षाचे एकरी उत्पादन सरासरी १२ टन इतके मिळते. द्राक्षाला ४० रुपये प्रति किलो दर ग्राह्य धरला तर एकरी ५ लाख रुपये उत्पन्न मिळते. अर्थात, राज्याचे द्राक्षाचे सुमारे ४ लाख एकर क्षेत्र असून त्याची उलाढाल सुमारे २० हजार कोटींच्या घरात जाते. परंतु गेल्या पंधरा दिवसांत झालेला पाऊस, बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्ष बागेला बसला आहे. अतिपावसाने बागाही पडल्या आहेत. त्यामुळे बागा पुन्हा उभा करण्यासाठी पैसा कसा उभा करायचा असा प्रश्न पडला आहे.   विभागनिहाय झालेले नुकसान

  • नाशिक ः ५० टक्के
  • सोलापूर ः २५ टक्के  
  • सांगली ः ६० टक्के
  • अति पावसामुळे राज्यातील द्राक्ष शेती धोक्यात आली आहे. पावसामुळे आर्थिक नुकसान झालेच आहे. पण पीक कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न उपस्थित होत असून शासनाने वीजबिल माफ करावे, कर्जाचे धोरण बदलावे, कर्ज वसुली थांबवून कर्ज थकले असले तरी शेतकऱ्यांना पुन्हा उभा राहण्यासाठी कर्ज दिले पाहिजे.   - शिवाजी पवार, अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ

    पूर्वहंगामातील काढणीला आलेल्या द्राक्षाला या अवकाळी पावसामुळे क्रॅकिंग होऊ लागले आहे. सांगली जिल्ह्यातील सुमारे ४ हजार कोटींचे प्राथमिक नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे.  - संजय बरगाले, विभागीय अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ, सांगली विभाग 

    पावसामुळे गळ आणि कुजीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे घडाचे नुकसान आहे. परिणामी, उत्पादनात घट होऊन आर्थिक फटका बसणार आहे. वातावरणात बदल होत असल्याने फवारणीचा खर्च वाढला आहे.  - निलेश माळी, द्राक्ष उत्पादक शेतकरी, सावळज, ता. तासगाव

    या आहेत समस्या

  • पोंगा अवस्थेतीतल घड जिरणे 
  • फळ धारणा कमी होणे 
  • उत्पादनात घट
  • फुलोरावस्थेतील बागांमध्ये गळ, कूज 
  • द्राक्ष घडातील मणी तडकणे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com