बोंड अळीग्रस्तांना १३५० कोटी वितरित

बोंडअळी
बोंडअळी

मुंबई : गेल्या हंगामातील कापसावरील गुलाबी बोंड अळीच्या नुकसानीपोटी राज्य सरकारने राज्य आपत्ती निवारण निधीतून (एसडीआरएफ) १३५० कोटी रुपयांचा दुसरा हप्ता नुकताच वितरित केला आहे. बोंड अळीग्रस्त सुमारे २२ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असे मदत आणि पुनर्वसन विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.  मदतीपैकी अजून तब्बल एक हजार कोटी रुपयांचे वाटप शिल्लक असून, संबंधित १५ लाख शेतकऱ्यांना मदतीसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार, अशी चिन्हे आहेत. २०१७ च्या खरिपात राज्यात गुलाबी बोंड अळीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. राज्य सरकारच्या प्राथमिक पाहणीनुसार ४३ लाख हेक्टर लागवडीपैकी सुमारे ३३ ते ३४ लाख हेक्टरवरील कापसाचे पीक बाधित झाले. बोंड अळीमुळे राज्यातील सुमारे ५५ लाख शेतकरी बाधित झाले होते.

यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे राज्य सरकारने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या (एनडीआरएफ) निकषांनुसार पिकांना मदत दिली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले. त्यानंतर संयुक्त पंचनाम्यानुसार निश्चित करण्यात आलेले ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या दरानुसार मदत देण्याचा निर्णय १७ मार्च २०१८ रोजी घेतला. त्यानुसार राज्य सरकारने केंद्र सरकारला मदतीची विनंती केली. पहिल्यांदा २,४२५ कोटी रुपयांच्या मदत मागणीचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात आला होता. त्यानंतर सुधारित ३,३७३ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र, ही मदत केंद्र सरकारकडून अजून मिळालेली नाही. मदत मिळण्यास होत असलेला विलंब आणि राज्यातील शेतकऱ्यांमध्ये वाढत असलेल्या असंतोषामुळे राज्य सरकारने ९ मे रोजी राज्य आपत्ती निवारण निधीतून पहिल्या टप्प्यात सुमारे १,००९ कोटींचा पहिला हप्ता वितरित केला. सुमारे १७ ते १८ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही मदत जमा केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आता १,३५० कोटींचा दुसरा हप्ता वाटप करण्यात आला आहे. सुमारे २२ लाख शेतकऱ्यांना ही मदत वितरित केली जाणार आहे. एकंदर नुकसानीपैकी उर्वरित एक हजार कोटींसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार, अशी चिन्हे आहेत. तिसऱ्या टप्प्यात राहिलेल्या १५ लाख शेतकऱ्यांना मदतीचे वाटप होणे बाकी आहे. मदत वितरित करताना बँक खाते आधारशी लिंक असलेल्या शेतकऱ्यांना मदतीची रक्कम तातडीने वितरित केली जात आहे. आधार नसलेल्या शेतकऱ्यांना इतर ओळखपत्राच्या पुराव्याद्वारे मदत वितरित केली जात असल्याचे सांगण्यात आले. एनडीआरएफच्या निकषांनुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी ६,८०० रुपये म्हणजे एकरी २,७२० रुपये आणि बागायतीसाठी हेक्टरी १३,५०० रुपये म्हणजे एकरी ५,४०० रुपये अशी मदत दिली जात आहे. ही मदत दोन हेक्टरपर्यंत दिली जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com