चंदगड, जि. कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बेळगाव बाजारपेठ बंद असल्याने चंदगड तालुक्यातील पार्ले आणि परिसरातील दहा गावांतील शिवारात काढणीला आलेली ओली मिरची आणि बिनीस अक्षरशः सडू लागले आहे. गुंतवणुकीचा पैसा मिळवणे ही अशक्य झाले असून सुमारे १५ कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
कोकण सीमेवरील हा भाग डोंगराळ, पांढऱ्या मातीचा. शेती मुबलक असूनही सिंचन व्यवस्था नसल्याने लोक रोजगारासाठी गोवा, बेळगाव, पुणे, मुंबई गाठत असत. दहा वर्षांत मात्र ही स्थिती बदलली. विहिरी, विंधन विहिरींव्दारे प्रत्येकाने शेतीसाठी पाण्याची व्यवस्था केली. भाजीपाला पीक घेण्यास सुरुवात केली आणि या पिकाने आर्थिक हातभार लावला.
इतका की सर्वसामान्य शेतकरी सुद्धा दोन -पाच लाखांची उलाढाल करू लागला. मिरची आणि बिनीसला हॉटेलमध्ये मोठी मागणी. बेळगाव सारखी मोठी आणि जवळची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने उत्पादीत मालाला मागणीही होती. गतवर्षी बिनीसला पोत्याला ५ हजाराचा दर होता. हॉटेल व्यवसाय बंद असल्याने ओल्या मिरचीला मागणीच नाही. पार्ले या एका गावातून दररोज दोन ट्रक बिनीस व मिरची जात होती.
उर्वरित गावातून मिळून दररोज २० ट्रक माल जात होता. वार्षिक १५ कोटींची उलाढाल होती, अशी माहिती सदानंद सीताप व रमेश झेंडे यांनी दिली. या वर्षी तोडलेले बिनीस सडून जात आहे. ओली मिरची परिपक्व झाल्यावर तिला मागणी नसते. परंतु या वर्षी मागणीच नसल्याने मिरची पिकू लागली आहे. एवढा भाजीपाला विकायचा कोठे असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. शासनाने वेळेत या शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आहे.
दीड एकरात बिनीस लावले आहे. सव्वा लाखांची गुंतवणूक केली आहे. परंतु बाजारपेठ नसल्याने काढलेले बिनीस सडत आहे. - योगेश गावकर, शेतकरी पार्ले, ता. चंदगड
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.