गरिबांसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज: निर्मला सितारामन

कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला सुरुवात केल्यानंतर केंद्राने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.
nirmala sitharaman
nirmala sitharaman

नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला सुरुवात केल्यानंतर केंद्राने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात देशातील शेतकरी, मजूर, गरीब नागरिक आणि निराधार महिलांना दिलासा देण्यासाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी गुरुवारी (ता.२६) दिली. 

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी पत्रकार परिषद घेत देशातील नागरिकांना दिलासा देण्यासाठीचे निर्णय जाहीर केले. ‘‘कोरोनाशी दोन करणाऱ्या सॅनिटेशन कामगार, डॉक्टर, नर्स, ‘आशा’ सेविका आणि पॅरामेडीक्स यांना प्रत्येकी ५० लाखांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. देशातील जवळपास ८० कोटी किंवा एक तृतीयांश जनतेला पुढील तीन महिन्यांसाठी प्रत्येक माणसासाठी पाच किलो गहू आणि तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. तसेच एक किलो दाळही मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे गरिबांचे हाल होणार नाहीत. त्यांना आवश्यक ते धान्य मिळेल. यापूर्वी पाच किलो धान्य देण्यात येत होते. आता आणखी पाच-पाच किलो गहू व तांदूळ देण्यात येणार आहे,’’ असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. 

‘‘शेतकऱ्यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे. ‘पीएम-किसान’ योजनेचा ८ कोटी ६९ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. मनरेगा योजनेत कामगारांच्या वेतनात १८२ रुपयांवरून २०२ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. प्रतिकामगार दोन हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या योजनेचा पाच कोटी कामगारांना लाभ होणार आहे,’’ अशी घोषणाही त्यांनी केली. 

महत्त्वाचे निर्णय... 

  • देशातील तीन कोटी ज्येष्ठ नागरिक आणि विधवा महिलांना पुढील तीन महिन्यांसाठी एक हजार रुपये देण्यात येणार आहे. 
  • जनधन खाते असलेल्या महिलांना पुढील तीन महिन्यांसाठी प्रत्येक महिन्यात ५०० रुपये देण्यात येणार आहे. २० कोटी महिलांना मिळणार लाभ. 
  • महिला उज्वला योजनेंतर्गत तीन महिने मोफत सिलिंडर मिळणार. ८.३ कोटी कुटुंबांना होणार लाभ. 
  • दिन दयाल राष्ट्रीय जीवन मिशन अंतर्गत महिला बचत गटांना २० लाखांपर्यंत कर्जे मिळणार. ६३ लाख गटांतील ७ कोटी सदस्यांना मिळणार लाभ. 
  • १०० पर्यंत कामगार असलेल्या आणि त्यांपैकी ९० टक्के कामगारांचे वेतन प्रतिमहिना १५ हजार रुपये असलेल्या कंपन्या आणि कामगारांचे पीएफचा हप्ता तीन महिने सरकार भरणार. 
  • देशातील साडेतीन कोटी बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी जवळपास ३१ हजार कोटी असलेला कल्याण निधी वापरण्याचे राज्यांना निर्देश देण्यात आले. 
  • ‘पीएम-किसान’चा हप्ता देणार  ‘‘लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येणार आहे. देशातील ८ कोटी ६९ लाख शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता देण्यात येणार आहे. हा निधी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होणार आहे,’’ अशी माहिती अर्थमंत्री सितारामन यांनी दिली.   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com