अकोला ः गेल्या वर्षात जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे या कालावधीमध्ये झालेल्या गारपिट व अवकाळी पावसाने ११ हजार २२२ हेक्टरवर क्षेत्र बाधित झाले होते. याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे जिल्हा प्रशासनाने सादर केला होता. त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून १७ कोटी ४३ लाख १९ हजार रुपयांची मदत जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाणार आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात जिरायती व बागायती पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला. याचा उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्यातच फेब्रुवारीमध्ये आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता. यामध्ये तूर, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर झाडांची पडझड, बगिच्यातील फळे गळून पडल्याने बागायती शेतीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
नुकसानग्रस्त क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले होते. त्याअंतर्गत जिल्ह्यातील नुकसानीचे संयुक्त पंचनामे करून शासनाकडे मदतीची मागणी करण्यात आली होती. दरम्यान १७ कोटी ४३ लाख १९ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला मिळाले असून, सदर निधीचे विभाजन करुन ते तहसीलदारांच्या खात्यात वळती करण्यात आल्यानंतर प्राप्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी १८ हजार तर बागायती पिकांसाठी १३ हजार पाचशे, तर जिरायती पिकांसाठी ६ हजार ८०० रुपयांप्रमाणे मदत दिली जाईल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तालुका प्रशासनाकडे तयार आहेत. त्यामुळे लवकरच मदत खात्यात जमा होणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.