राज्यात विविध घटनांमध्ये वर्षभरात १७८ बिबट्यांचा मृत्यू

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात बिबट्यांची संख्या १ हजार ६९० झाली आहे. त्यात राखीव जंगलाच्या बाहेरील बिबट्याचा समावेश नाही.
bibtya
bibtya

नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात बिबट्यांची संख्या १ हजार ६९० झाली आहे. त्यात राखीव जंगलाच्या बाहेरील बिबट्याचा समावेश नाही. मात्र, राज्यात गेल्या वर्षात नैसर्गिक, रस्ते, रेल्वे अपघात, विहिरीत पडून, शिकार, विजेच्या प्रवाहासह इतर कारणांमुळे १७८ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची बाब चिंता वाढवणारी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बिबट्यांचे मृत्यू ६८ने वाढले आहेत.  बिबट्याचे आवडते खाद्य म्हणजे कुत्रा. त्यामुळे तो अधिकाधिक गावाजवळ त्याचा वावर असतो. त्यामुळे बिबट्या शेतकरी अथवा गावकऱ्यांना त्रासदायकही ठरत असतो. त्यामुळे गावकरीही विजेचा प्रवाहाचा वापर करतात. परिणामी बिबट्याचे मृत्यू वाढले आहेत. या प्रकारामुळे राज्यात गतवर्षी एक तर यंदा तब्बल दहा बिबट्यांचा मृत्यू झाला आहे, तर रस्ते अपघातात ३४ तर कठडे नसलेल्या विहिरीत पडून तब्बल २५ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. २०१९मध्ये १० बिबट्यांचे जीव गेला होता. बिबट्याच्या अधिवासातून महामार्ग आणि रेल्वे मार्ग जात असल्याने हे रस्ते त्यांच्यासाठी जीवघेणे ठरू लागले आहेत.  बिबट्याचा नैसर्गिक स्वभाव, वर्तणूक, बदलणाऱ्या परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची क्षमता व मोठ्या प्रमाणातील प्रजोत्पादनामुळे बिबट्यांच्या संख्या वाढत आहेत. बिबट्यांचा मुक्त संचार सर्वत्र क्षेत्रात असल्याने राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि इतर जिल्हा मार्गावरही त्याचा मृत्यूच्या घटना घडतात. या कारणामुळेच मानव-बिबट्यांचा संघर्ष वाढतो आणि बिबट्यांचे मृत्यू व मानव हानीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे, असे अधिकाऱ्यांचा म्हणणे आहे. २०१९मध्ये मनुष्यहानीच्या ८ घटना घडल्या असून, २०२० मध्ये २४ घटना घडल्या आहेत. त्यात सर्वाधिक १२ मनुष्य हानीच्या घटना नाशिक जिल्ह्यात घडल्या आहेत. त्या पाठोपाठ चार औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत.  बिबट्यांची शिकार? गेल्या दोन दिवसांत विदर्भात बिबट्याचे मृतदेह सापडल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. इंदिरानगर, तिल्ली मोहगाव येथील देवचंद सोनवणे यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत बिबट्याचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती एका व्यक्तीने वनविभागाला दिली. या माहितीवरून गोरेगाव येथील वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. बिबट्या विहिरीतून बाहेर काढण्यात आला. या वेळी बिबट्याच्या समोरील पायाचे दोन्ही पंजे गायब असल्याचे समोर आले. राज्यातील बिबट्यांची स्थिती

  • राखीव जंगलातील बिबट्यांची संख्या १६९० झाली
  • नैसर्गिक, रस्ते, रेल्वे अपघात, विहिरीत पडून, शिकार, विजेच्या प्रवाहासह इतर कारणांमुळे १७८ बिबट्यांचा मृत्यू 
  • २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये बिबट्यांचे मृत्यू ६८ने वाढले 
  • बिबट्याच्या अधिवासातून जाणारे महामार्ग, रेल्वे मार्ग ठरले जीवघेणे
  • मनुष्यहानीच्या सर्वाधिक बारा घटना नाशिक जिल्ह्यात घडल्या
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com