२०१९ मध्येही मोदी सरकारच : अमित शहा

मुंबई ः भाजपच्या ३८व्या स्थापनादिनी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानावर आयोजित महामेळाव्यात शुक्रवारी (ता.६) बोलताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा.
मुंबई ः भाजपच्या ३८व्या स्थापनादिनी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानावर आयोजित महामेळाव्यात शुक्रवारी (ता.६) बोलताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा.

मुंबई : २०१९ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात स्थापन होणार असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी (ता. ६) केला. तसेच, मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांच्या हिताचाच कारभार करीत असून, सरकार शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देणार असल्याचे आश्‍वासन शहा यांनी दिले.  

भाजपच्या ३८व्या स्थापनादिनी मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानावर आयोजित महामेळाव्यात ते बोलत होते. शहा यांनी या वेळी भाजपची वाटचाल आणि केंद्र सरकारच्या कामगिरीचा आढावा घेत कार्यकर्त्यांना पुढील निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले. शहा म्हणाले, ‘‘महापूर आला की सगळी खुरटी झाडे, झुडपे मोडून पडतात, केवळ वटवृक्ष राहतो. मग पुराला घाबरलेले सगळे साप, मुंगूस, कुत्री, मांजरी त्या वृक्षाचा आसरा घेतात. त्याचप्रमाणे सध्या सगळे विरोधक आता मोदी नावाच्या महापुरापासून वाचण्यासाठी एकत्र आले आहेत.’’ 

तसेच, ‘मोदी सरकारने एससी, एसटी अॅक्ट हटवल्याचा अपप्रचार केला जात आहे; पण असे काहीही होणार नाही. मोदी सरकार आरक्षणाला हात लावणार नाही आणि कोणाला लावूही देणार नाही,’ असे शहा यांनी स्पष्ट केले. 

महाराष्ट्रात सिंचनासाठी १ लाख कोटी  भाजपने कधीच धर्म, जातीचे राजकारण केले नाही असे सांगत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, की काही लोक महाराष्ट्रावर राज्य करणे आपला अधिकार समजत होते, ते आता निराश झाले आहेत. जे प्रकल्प बंद पडलेत ते एका वर्षात पूर्ण करणार असून, महाराष्ट्रातील सिंचनासाठी १ लाख कोटी रुपये दिल्याचे त्यांनी सांगितले.

पवार साहेब चहावाल्याच्या नादी लागू नका  महाराष्ट्र सरकार चहावर किती पैसा खर्च करते यावर शरद पवारांनी केलेल्या टीकेचा उल्लेख करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले, की तुम्ही उगाच चहावाल्यांच्या नादी लागू नका. जरा २०१४ आठवा की चहावाल्यांनी तुमची काय हालत केली. 

मुंडे समर्थकांची नाराजी  मुंबईतील भाजपच्या स्थापना मेळाव्यातच महाराष्ट्र भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली. स्थापना मेळाव्याच्या ठिकाणी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे एकही पोस्टर नसल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले व त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. काही कार्यकर्त्यांनी खुर्च्या उचलून आपला संताप व्यक्त केला. अखेर कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांना पुढे यावे लागले. त्यांनी व्यासपीठावर येऊन कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com