सांगली : जिल्ह्यात चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला. अनेक भागातील पंचवीस पुल पाण्याखाली गेले. ७१ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
चांदोली ते उमदी पर्यंत मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे सर्वाधिक भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. पाणी साचल्याने फळ कुज होऊ लागली असून फुल शेतीचेही नुकसान झाले आहे. सांगली येथील आयर्विन पुलाजवळ कृष्णाची पातळी ३२ फुटापर्यंत पोहोचली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
संततधार पावसामुळे खानापूर, आटपाडी, तासगाव आणि जत तालुक्यातील ७२ ठिकाणच्या रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. या भागात तील नदी, ओढ यांना महापूर आले. सुमारे सोळा तासांहून अधिक संततधार पाऊस सुरू होता. शेतात पाणी साचले आहे. भुईमूग ऊस व भाजीपाला या पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.
जिल्ह्यातील दुष्काळी तालुका असलेले खानापूर, तासगाव, आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ या तालुक्यात बुधवारी (ता. १४) सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. जत तालुक्यातील बोर नदीला पूर आला आहे.
जिल्ह्यात सातत्याने पाऊस असल्याने भाजीपाला पिकांत पाणी साचले. त्यामुळे फळ कुज होऊ लागली आहे. दसऱ्यासाठी फुले विक्रीसाठी येतील, असे नियोजन केले होते. मात्र पावसाने फुल शेतीचेही नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून निघणारे नाही. - वैभव कोकाटे, वाळवा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.