देशातील जलाशयांमध्ये २५ टक्के पाणीसाठा

भंडारदरा
भंडारदरा

नवी दिल्ली ः वाढत्या उष्णतेमुळे देशातील जलाशयांमधील पाणीसाठा कमी होत आहे. सध्या देशातील ९१ महत्त्वाच्या जलाशयांमधील पाणीसाठा ४०.५९२ अब्ज घनमीटर म्हणजेच एकूण क्षमतेच्या २५ टक्के आहे. हा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के अधिक आहे, तर दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ४ टक्के अधिक आहे, अशी माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली आहे. केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर, दक्षिण आणि मध्य भारतात पाणीसाठा अधीक आहे. तर पूर्व आणि पश्‍चिम भारतातील जलाशयांमध्ये पाणीसाठा कमी आहे. मागील वर्षी याच काळात ३५.४११ अब्ज घनमीटर पाणीसाठा होता. यंदा ४०.५९२ अब्ज घनमीटर पाणीसाठा आहे. राज्यनिहाय पाणीसाठ्याचा विचार करता हिमाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तराखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा आहे. पश्‍चिम विभागात १७ टक्के पाणी देशातील पश्‍चिम विभागात गुजरात आणि महाराष्ट्र दोन राज्यांचा समावेश होतो. पश्‍चिम विभागात २७ जलाशयांचा समावेश असून, जिवंत पाणीसाठ्याची क्षमता ३१.२६ अब्ज घनमीटर आहे. सध्या या विभागात केवळ ५.२२ अब्ज घनमीटर पाणीसाठा असून, एकूण क्षमतेच्या केवळ १७ टक्के साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच काळात २३ टक्के साठा होता, तर दहा वर्षांची सरासरी २६ टक्के आहे.  मध्य विभागात २९ टक्के पाणीसाठा  मध्य विभागातील उत्तर प्रदेश, उत्तरखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमधील १२ मोठ्या जलाशयांची जिवंत पाणीसाठ्याची क्षमता ४२.३० अब्ज घनमीटर आहे. सध्या या विभागातील जलाशयांमध्ये १२.२४ अब्ज घनमीटर पाणीसाठा आहे. म्हणेजच एकूण क्षमतेच्या २९ टक्के साठा शिल्लक आहे. विभागात गेल्या वर्षी याच काळात २७ टक्के म्हणजेच दहा वर्षांच्या सरासरीएवढा पाणीसाठा होता. दक्षिण विभागात सर्वांत कमी पाणी दक्षिण विभागात आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, करेळ आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. या विभागातील ३१ जलाशयांची जिवंत पाणीसाठ्याची क्षमता ५१.५९ अब्ज घनमीटर आहे. सध्या या जलाशयांमध्ये ८ अब्ज घनमीटर म्हणजेच केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच काळात १४ टक्के साठा शिल्लक होता. गेल्या दहा वर्षांचा सरासरी १७ टक्के असून, सध्या दोन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नऊ राज्यांमध्ये कमी पाणीसाठा  ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या एवढा पाणीसाठा आहे. तर राजस्थान, झारखंड, पश्‍चिम बंगाल, त्रिपुरा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि करेळ या नऊ राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. यापैकी महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी दुष्काळ जाहीर केला आहे.   उत्तर विभागात ५० टक्के पाणीसाठा उत्तर विभागातील हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थान या राज्यांतील सहा मोठ्या जलाशयांची जिवंत पाणीसाठ्याची क्षमता १८.८३ अब्ज घनमीटर आहे. सध्या या जलाशयांमध्ये ९.०६ अब्ज घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच सध्या जिवंत पाणीसाठा ५० टक्क्यांवर आहे. उत्तर विभागात याच काळात मागील वर्षी १९ टक्के पाणीसाठा होता. तर विभागातील या काळातील पाणीसाठ्याची सरासरी २७ टक्के आहे. म्हणजेच सध्या हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थान या राज्यांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. पूर्व विभागात ३२ टक्के साठा पूर्व विभागात झारखंड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल आणि त्रिपुरा राज्यांचा समावेश आहे. पूर्व विभागात मोठे १५ जलाशये आहेत. या जलाशयांची जिवंत पाणीसाठ्याची क्षमता १८.८३ अब्ज घनमीटर आहे. सध्या या जलाशयांमध्ये ६.०७ अब्ज घनमीटर आहे. म्हणजेच एकूम क्षमतेच्या केवळ ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच काळात ३४ टक्के पाणीसाठा होता. तर पूर्व विभागाची गेल्या १० वर्षांची पाणीसाठ्याची सरासरी ३१ टक्के आहे. म्हणजेच सध्या गेल्या वर्षीपेक्षा दोन टक्के पाणीसाठा कमी आहे, तर दहा वर्षांच्या सरासरीच्या एक टक्का अधिक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com