जळगाव जिल्ह्यात 'जलयुक्त' अभियानापासून २६० गावे वंचित

जळगाव जिल्ह्यात 'जलयुक्त' अभियानापासून २६० गावे वंचित
जळगाव जिल्ह्यात 'जलयुक्त' अभियानापासून २६० गावे वंचित

जळगाव ः मुख्यमंत्री यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळख असलेला 'जलयुक्‍त शिवार' अभियानाचा यंदा शेवटचा टप्पा आहे. या अभियानाचे यश पाऊस दमदार झालाच तरच दिसत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एक हजार १५२ गावे आहेत. त्यातील आतापर्यंत ८९५ गावांचा समावेश या योजनेत करण्यात आला. उर्वरित सुमारे २६० गावे अद्याप या अभियानापासून वंचित आहेत. त्यात वंचित तालुक्‍यांमध्ये रावेर, यावल, चोपडा या ''डार्क झोन''मधील तालुक्‍यांतील गावांचा समावेश आहे. या गावांचा पुढे समावेश करणार की आणखी दुसरे अभियान या गावांमध्ये जलसंधारणाबाबत हाती घेणार? असा प्रश्‍न चर्चिला जात आहे.  शेतकऱ्यांना शाश्‍वत पाणी मिळावे यासाठी शासनाने २०१५-१६ मध्ये 'जलयुक्त शिवार' अभियानाची घोषणा करून सुरू केले. अभियानांतर्गत कामांत पहिल्या वर्षी समाधानकारक पाणी साचले नाही. दुसऱ्या अन्‌ तिसऱ्या टप्प्यात कामे होऊन अनेक गावांना डिसेंबर- जानेवारीपर्यंत कामांमुळे सिंचनाचा लाभ झाला. शेतातील पिकांना पाणी देऊन दुष्काळातही ती घेता आली. मात्र, तिसऱ्या टप्प्यात अतिउन्हामुळे जानेवारीमध्येच अभियानांतर्गत झालेल्या कामांतून साचलेले पाणी आटले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, यंदा पाऊसच कमी झाल्याने 'जलयुक्त'च्या कामांमध्ये पाणी साठले नसल्याचे उत्तर मिळते. वास्तविक पाहता, अनेक कामांमध्ये जमिनीची खोली इतर तांत्रिक बाबींची पूर्तता न झाल्याने पाणी दीर्घकाळ साठू शकले नाही. जिल्ह्यातील रावेर, चोपडा, यावल या तीन तालुक्‍यांत हव्या त्या प्रमाणात 'जलयुक्त'ची कामे झाली नाहीत. यंदा डिसेंबरअखेर हे अभियान संपेल. उर्वरित गावांची पाणीपातळी वाढविण्यासाठी किंवा त्या गावांतील शेतकऱ्यांना शाश्‍वत पाणी मिळण्यासाठी शासनाने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे.  'जलयुक्त शिवार' अभियानांतर्गत जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २३२ गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये 'जलयुक्त'अंतर्गत सात हजार ४०७ कामे करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात २०१६-१७ मध्ये २२२ गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये चार हजार ८५७ कामे करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात २०६ गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये चार हजार ८९ कामे हाती घेण्यात आली. २०१७-१८ मध्ये निवड करण्यात आलेल्या २०६ गावांमध्ये चार हजार ९७ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. पैकी चार हजार ७९ कामे पूर्ण झाली, तर १३ कामे प्रगतिपथावर आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com